रायगडमधील उरण येथून मुंबईला येणारी बोट भरकटल्याची घटना गुरुवारी घडली. बुचर बेटाजवळ ही बोट भरकटली होती. जवळपास दोन तास या बोटीला मदत मिळत नसल्याने बोटीतील प्रवाशी भयभीत झाले. अखेर दोन तासांनी बोटीतील प्रवाशांच्या मदतीसाठी आणखी दोन बोट आल्या आणि सर्वांनीच सुटकेचा श्वास सोडला. उरणमधून मुंबईला येणारी 'एम एल कासाम' ही बोट गुरुवारी सकाळी उरणमधून निघाली. मात्र, बुचर बेटाजवळ ही बोट भरकटली. यामुळे बोटीतील ५० ते ६० प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. जवळपास दोन तासांनी भयभीत प्रवाशांशी संपर्क साधण्यात यश आले. या बोटीच्या मदतीसाठी आणखी दोन बोट तिथे पोहोचल्या. अखेर ही बोट किनाऱ्यावर आणण्यात यश आले आणि सर्वांनीच सुटकेचा श्वास सोडला. 'एम एल कासाम' असे या लाँचचे नाव असून ती नादुरुस्त होती, अशी माहितीही समोर आली आहे.