तहानलेल्या लातूरकरांना रेल्वेने ६.२० कोटी लिटर पाणी दिल्यानंतर आता मध्य रेल्वेकडून लातूरच्या जिल्हा प्रशासनाला वाहतुकीच्या खर्चाचे बिल पाठविण्यात आले असून, ती रक्कम चार कोटींच्या घरात आहे. लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना हे बिल पाठविण्यात आले आहे.
मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक एस के सूद म्हणाले, प्रशासनाच्या मागणीप्रमाणे आम्ही लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना पाण्याच्या वाहतुकीच्या खर्चाचे बिल पाठवले आहे. आता हे बिल थेट चुकते करायचे की त्यातून सवलत मागायची याचा निर्णय जिल्हा प्रशासन आणि राज्य सरकारला घ्यायचा आहे. सवलत घ्यायची असेल, तर त्यासाठी त्याना ठराविक पद्धत अवलंबावी लागेल. आम्ही फक्त वाहतुकीच्या खर्चाचे बिल पाठवून आमचे काम पूर्ण केले आहे.
गेल्या महिन्यात ११ तारखेला मिरजेहून पाच लाख लिटर पाणी घेऊन रेल्वेच्या दहा वाघिण्या लातूरकडे रवाना झाल्या होत्या. लातूरमध्ये १२ एप्रिलपासून या पद्धतीने पाणीपुरवठा करण्यात येतो आहे. मिरज ते लातूर हे सुमारे ३४२ किलोमीटरचे अंतर रेल्वेच्या वाघिण्यांनी पाणी वाहून नेले. रेल्वेने पाणी पुरवठा करण्यासाठी राजस्थानमधून खास वाघिण्या मागविण्यात आल्या आहेत. लातूरला ५० वाघिण्यांमधून २५ लाख लिटर पाणी सध्या देण्यात येत होते. एकूण सहा कोटी २० लाख लिटर पाणी या माध्यमातून आतापर्यंत लातूरला देण्यात आले आहे.