मराठवाड्यातील बीड, परभणी, उस्मानाबाद आणि हिंगोलीत पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. महाराष्ट्रासह मराठवाड्याला पावसाची प्रतीक्षा लागलेली होती. जी आता संपली आहे येत्या दोन ते तीन दिवसात आणखी पाऊस पडेल अशी अपेक्षा बळीराजाला आहे. गेल्या १७ दिवसांपासून पावसाची चातकासारखी वाट सगळेचजण बघत आहेत. मराठवाड्याला दुष्काळाचे सर्वाधिक चटके बसल्याने या भागातले शेतकरीही पावसाची वाट बघत होते आणि अखेर वरूणराजाने बरसण्यास सुरूवात केलेली आहे. बीड, परभणी, उस्मानाबाद या ठिकाणी चांगला पाऊस झाला आहे. तर हिंगोलीमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. यामुळे वातावरणातला उकाडा दूर झाला आहे. तसेच शेतकरी आणि सामान्य नागरिक यांना दिलासा मिळाला आहे.

बीडमधल्या करपरा नदीचं रूप एका पावसात बदललं आहे. या नदीची पुजाऱ्यांकडून आज पूजा करण्यात आली. काल रात्रीपासूनच मराठवाड्यातील बीड, उस्मानाबाद, हिंगोली आणि परभणी या चारही जिल्ह्यांमध्ये चांगला पाऊस झाला आहे. सकाळी काही वेळ पावसाने उघडीप दिली होती मात्र पुन्हा एकदा पावसाला सुरूवात झाली आहे. त्यामुळे सगळ्यांच्याच पावसाकडून अपेक्षा वाढल्या आहेत. बळीराजाच काय तर सगळे लोकही चातकासारखी पावसाची वाट पहात होते अखेर सतरा दिवसांनी चांगला पाऊस झाला आहे. पाऊस नसल्याने शेतकरी हतबल झाला होता. लोकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागला. सगळ्यांचेच डोळे आभाळाकडे लागले होते. मात्र पावसाने वाट बघणाऱ्या सगळ्यांनाच दिलासा दिला आहे. रात्रीपासूनच पावसाने बरसण्यास सुरूवात केली आहे. पेरणीसाठी अनुकूल असा पाऊस नसला तरी तसा पाऊस येत्या काही दिवसात पडेल अशी अपेक्षा व्यक्त होते आहे.

वायू वादळाचा परिणाम झाल्याने मान्सूनचं आगमन लांबलं. आता पाऊस बरसण्यास सुरूवात झाली आहे. वरूणराजाने आता गेल्या काही दिवसांमधली जी तूट आहे ती भरून काढावी असं मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना आणि सामान्य नागरिकांना वाटतं आहे. पावसामुळे मराठवाड्यातल्या या चार ठिकाणी आल्हाददायक वातावरण निर्माण झालं आहे