राज ठाकरे यांच्या नेतृत्वात मनसेने रविवारी पाकिस्तान आणि बांगलादेशातील घुसखोरांना देशाबाहेर काढण्याच्या मागणीसाठी मुंबईत मोर्चा काढला. हिंदू जिमखाना येथून सुरू झालेला मोर्चा आझाद मैदानात पोहोचला. त्यांनतर राज ठाकरे यांनी सीएए, एनआरसीविरोधात मोर्चे काढणाऱ्यांना सज्जड दम दिला. त्यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे १. अरे मी काय ट्रेन आहे का? "काही जण मला म्हणत होते की, ११.५५ मिनिटांनी येणार आहे? मी त्यांना बोललो, मी काय ट्रेन आहे का वेळेवर यायला? वेळ लागतो," अशा शब्दांत राज ठाकरे यांनी भाषणाला सुरुवात केली. २. या देशातील मुस्लिमांना कोण देशातून काढतंय "सीएए आणि एनआरसीवरून देशभरात मुस्लिमांनी मोर्चे काढले. मला या मोर्चांचा अर्थच लागत नाही. देशातील मुस्लिमांना कोण हाकलणार आहे? कायद्याबद्दल माहिती नसणारेही कसे बोलत आहे?," असा सवाल राज ठाकरे यांनी केला. ३. भारतानं माणुसकीचा ठेका घेतलेला नाही "पाकिस्तानातील अल्पसंख्याक हिंदूवर अत्याचार होत आहेत. पाकिस्तानातील मुस्लिमांना भारतात नागरिकत्व देण्याची काय गरज? माझा देश धर्मशाळा आहे का? माणुसकीचा भारतानं घेतलेला नाही?," असा टोलाही राज ठाकरे यांनी लगावला. ४. सरकारची स्तुती केली, तर भाजपाचा समर्थक? "आपल्या देशात उजवा किंवा डावा इतकंच सुरू आहे. जे चांगलं त्याला चांगलं म्हणालो. जे वाईट होतं त्याच्यावर टीका केली. केंद्र सरकारच्या निर्णयावर मी टीका केली, त्यावेळी मला भाजपा विरोधक ठरवण्यात आलं. आता भाजपाचं समर्थक ठरवलं जात आहे," असं प्रत्युत्तर राज ठाकरे यांनी टीकाकारांना दिलं. ५. मराठी मुस्लिमांमुळे दंगली होत नाही - राज ठाकरे घुसखोरांविरोधात काढण्यात आलेल्या मोर्चात बोलताना राज ठाकरे यांनी कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्यांना इशारा दिला. "देशात आता सफाई करण्याची वेळ आली आहे. आता तर नायजेरियनही येऊ लागले आहेत. उद्या हेच तुमच्यावर हात उचलतील. बाहेरून आलेल्या लोकांमुळे बॉम्बस्फोट, दंगली होत आहेत. मराठी मुस्लिमांमुळे दंगली होत नाहीत," असं राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं. ६. दगडानं दगडाला अन् तलवारीला तलवारीनं उत्तर देऊ "जो देशात राहणाऱ्या माणसांना बाहेर काढले जाणार नाही. इथला आदिवासी इथेच राहणार आहे. मोर्चे काढणाऱ्यांनी आजचा मोर्चा बघावा आणि एकोप्यानं राहावं. नाहीतर इथून पुढे दगडाला दगडानं आणि तलवारीला तलवारीनं उत्तर देऊ," असा इशारा राज ठाकरे यांनी यावेळी दिला. ७. आर्थिक अराजकता लपवण्यासाठी कायदा आणला का? "देशात सीएए, एनआरसीवरून गोंधळ सुरू आहे. पण, केंद्र सरकारलाही विचारणार आहे. देशात सध्या जी आर्थिक अराजकता निर्माण झाली आहे. ती अराजकता लपवण्यासाठी हा कायदा करत आहात का? हे आधी स्पष्ट करावं," असंही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.