लोकसभा निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कृष्णकुंजवर नेत्यांची बैठक बोलावली आहे. बैठकीला मनसे नेते आणि पदाधिकारी उपस्थित आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी निवडणुकीपर्यंत राज ठाकरे आमच्यासोबत रहातील असे वाटत नाही असं सांगत मनसेला महागठबंधनमध्ये स्थान नसल्याचं स्पष्ट केलं होतं. याच पार्श्वभूमीवर पर्यायांचा विचार करण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आल्याचं कळत आहे.

राज ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजेच मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात जवळीक वाढते आहे का? असे वाटत असतानाच शरद पवारांनी मात्र निवडणुकीपर्यंत राज ठाकरे आमच्यासोबत रहातील असे वाटत नाही असे म्हटले. खुद्द शरद पवारांनीच महागठबंधनमध्ये मनसेला स्थान नसल्याचं सांगितल्याने मनसे आणि राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चेवर पडदा पडला आहे.

राष्ट्रवादीचे नेते सचिन अहिर यांनीही त्यांची भूमिका स्पष्ट केली होती. येत्या निवडणुकीत मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात आघाडी होणार नाही असा दावाच अहिर यांनी केला आहे. त्यामुळेच मुंबईतली कोणतीही जागा मनसेसाठी सोडण्याचा प्रश्नच येत नाही असंही अहिर यांनी म्हटलं होतं.