काळा पैसा बाहेर काढण्यासाठी नोटाबंदीचा निर्णय घेतला, यामध्ये जेमतेम १० हजार कोटी रूपये बाहेर आले. परंतु याउलट नवीन नोटा तयार करण्यासाठी सरकारलाच जवळपास १५ हजार कोटी खर्च करावे लागले असे सांगत एका व्यक्तीच्या हट्टापायी देश खड्ड्यात गेला अशी परखड टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर केली आहे.

आगामी निवडणुकांसाठी पक्षाचा आढावा घेण्यासाठी औरंगाबादमध्ये आले असता राज ठाकरे पत्रकारांशी बोलत होते. निवडणुकीदरम्यान केलेल्या विकास कामावर मतदान मिळते यावरून माझा विश्वासच उडाला आहे. कारण नाशिक शहरातील केलेल्या विकासकामाचा तेथील जनतेला विसर पडला होता, त्यामुळे त्यांनी मतदान करताना माझ्या पक्षाचा विचार केला नाही अशी खंत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. विकासावर मतदान करणार नसाल तर सगळे भावनांसोबतच खेळणार असंही ते यावेळी म्हणाले.

औरंगाबाद शहराच्या अवस्थेला जनता स्वत: जवाबदार असून त्यांनी निवडून दिलेले राजकीय नेते केवळ जातीचे राजकारण करून भिती दाखवूनच मत मिळवतात, आणि तुम्ही त्याला बळी पडतात असे परखड मत राज ठाकरे यांनी व्यक्त केले. शिवसेना-भाजपा-एमआयएम सगळ्यांचं आतमधून लाटसोटं असल्याची टीका करताना छोट्या मोठ्या दंगली घडवतात आणि तुम्हाला घाबरवतात असंही म्हटलं आहे.

नाशिकमध्ये अडीच वर्ष माझ्याशी राजकारण खेळलं गेलं – राज ठाकरे
मी जेव्हा नाशिक महानगपालिका पाहत होतो तेव्हा अडीच वर्ष पालिका आयुक्त दिले नव्हते. अडीच वर्ष आयुक्त न देताही जेवढ्या प्रकारची कामं नाशिकमध्ये घडली तेवढी दुसऱ्या कोणत्याही शहरात घडलेली तुम्हाला दिसणार नाहीत. जर नगरसेवकांना कामंच करायची नसतील तर आणि ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांना शहरात काही नवीन करायचंच नसेल तर आयुक्त असले काय आणि नसले काय काय फरक पडतो. अडीच वर्ष महापालिकेला आयुक्त नसताना जर कामं होऊ शकतात तर मग दोन महिन्याचं काय घेऊन बसलात. अडीच वर्ष राजकारणच खेळलं गेलं ना माझ्याशी असं राज ठाकरे बोलले.