दिल्लीमध्ये आम आदमी पक्षाच्या माध्यमातून झालेला बदल चांगला आहे. मात्र, महाराष्ट्रात या क्षणाला तरी तसे वातावरण नाही. महाराष्ट्रात आम्हीच बाप आहोत, असे वक्तव्य महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी नाशिकमध्ये केले.
नाशिकमधील पक्षाच्या पदाधिकाऱयांच्या बैठकीनंतर राज ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी आम आदमी पक्षाच्या दिल्लीतील यशाबद्दल काय वाटते, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना ते म्हणाले, दिल्लीमधील घडलेला बदल चांगलाच आहे. इतर जे राजकीय पक्ष सध्या सत्तेवर बसले आहेत. त्यांना जाणीव होईल की जनतेची कामे केलीच पाहिजेत. नाहीतर लोकं दुसरीकडे जातील. कॉंग्रेस पक्षाने दिल्लीमध्ये काम न केल्यामुळेच आज त्यांच्यावर ही वेळ आली. महाराष्ट्रात मात्र सध्या तसे वातावरण नाही. इथे आम्हीच बाप आहोत.