अर्जुना नदी खोरे समृद्धी अभियानांतर्गत राजापूर तालुक्यातील गावांच्या सर्वागीण विकासाचा सुमारे १ कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. मात्र, या आराखडय़ाच्या अंमलबजावणीसाठी अद्यापही शासनाकडून निधीची तरतूद झालेली नाही. त्यामुळे हा आराखडा अंमलबजावणी न होता निधीअभावी पडून राहिलेला आहे. कोकण भूमी प्रतिष्ठानच्या पुढाकाराने अर्जुना नदी पुनरुज्जीवनाचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमाचाच एक भाग म्हणून अर्जुना नदीच्या काठावरील २८ गावांचा विकास करण्याचा निर्धारही करण्यात आला आहे. या गावांमध्ये करक, पांगरीखुर्द, तळवडे, कारवली, पाटकरवाडी, पाचल, बाजारवाडी, पेठवाडी, रायपाटण, टक्केवाडी, बागवेवाडी, गांगणवाडी, येळवण, कोळवणखडी, मुसलमानवाडी, ठिकाणकोंड, उन्हाळे, दोनिवडे, शिळ, कोंडय़ेतर्फ राजापूर, परटवली, गोठणेदोनिवडे, हातणकरवाडी, चिखलगाव, पाजवेवाडी, मळेवाडी, आंगले, फुपेरे या गावांचा समावेश आहे. या गावांचा सर्वागीण विकास करण्यासाठी अर्जुना नदी खोरे समृद्धी अभियानांतर्गत दोन महिन्यांपूर्वी आराखडा तयार करण्यात आला. या आराखडय़ामध्ये संबंधित गावांमधील जलसंधारण, मृदसंधारण, रस्ते यांच्यासह पर्यटन विकासाच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या विविध विकासकामांचा समावेश आहे. नदीच्या काठावरील या गावांचा सुमारे १ कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये या आराखडय़ाला आर्थिक तरतूद होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, ती फोल ठरली. प्रत्यक्षात शासनाकडून त्यावेळी कोणतीही तरतूद केलेली नाही. त्यामुळे गावविकासाचा महत्त्वाकांक्षी असलेला हा आराखडा सध्या निधीच्या प्रतीक्षेत राहिलेला आहे.