महेश जोशी, लोकसत्ता कोपरगाव : संत तुकाराम महाराजांचे राहिलेले अवतारकार्य पूर्ण करण्याची जबाबदारी चिदंबर स्वामी यांचे शिष्य भागवत भक्त हरिसिंग यांचे चिरंजीव राजाराम महाराज यांच्यावर येऊन पडली होती. त्यांनी ती पूर्ण केली व सुमारे २२५ वर्षांपूर्वी २ लाख अभंग, एक लाख ५१ हजार ४९१ ओव्या भोजपत्रावर लिहून ठेवले आहे, मात्र हे साहित्य दुर्लक्षित असून त्याचे संवर्धन व्हावे अशी मागणी औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील बाभूळगाव गंगा येथील देवस्थानचे अध्यक्ष कैलास परदेशी यांनी केली आहे. राजाराम महाराजांचा जन्म २५२ वर्षांपूर्वी झाला होता. ३० मार्च रोजी यांचा जन्मोत्सव आहे, याहीवर्षी करोनाचे नियम पाळून त्या पार्श्वभूमीवर पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. राजाराम महाराजांनी हे सर्व अभंग बाजरी ती काळी होईपर्यंत भाजून तिची पावडर तयार करून तयार केलेला काळ्या शाईने बोरूच्या साह्यने लिहून ठेवलेले आहेत. हा ठेवा खूपच अमूल्य आहे पण सध्या तो दोन कपाटांत बंदिस्त अवस्थेत पडून आहे. चिदंबर स्वामींचे महाराष्ट्रात आगमन झाले. त्या वेळी त्यांनी दक्षिणगंगा गोदावरी किनाऱ्यावर बाभूळगाव गंगा येथे वास्तव्य केले होते. लक्ष्मीबाई यांच्या पोटी राजाराम महाराजांचा जन्म शके १९९० मध्ये झाला. हरिसिंह हे विठ्ठलभक्त होते. ते नियमित पंढरपूर पायी वारी करत असत. त्यांचे गुरु द्वारकादास होते. राजाराम महाराजांनी त्यांना वयाच्या आठव्या वर्षी देवाचे दर्शन होईल अशा असा साक्षात्कार सांगितला होता. त्याप्रमाणे चिदंबर स्वामी यांनी बाळेश्वर मंदिरात राजाराम महाराजांना दर्शन दिले, अशी अख्यायिका आहे. राजाराम महाराजांना चिदंबर स्वामींचा मोठा सहवास लाभला आहे. त्यांनी भक्तीचा व ज्ञानाचा मार्ग दाखवला. राजाराम महाराजांनी दोन लाख अभंग ओव्या संख्या एक लाख ५१ हजार ४९१ मूळ स्वरूपात भोजपत्रावर लिहून ठेवले आहे. ते आजही बाभूळगाव गंगा येथे पाहावयास मिळतात आणि त्याचे संवर्धन व्हावे तसेच मंदिर परिसराचा विकास व्हावा सुशोभीकरण व्हावे. भक्तनिवास अन्नछत्र लय उभारले जावे अशी मागणी येथील अध्यक्ष परदेशी व भाविक भक्तांची आहे. चिदंबर स्वामींनी राजाराम महाराजांनी त्या मूर्ती सौंदत्ती कर्नाटक येथून चालवित आणून परदेशी यांच्या घरात त्या मूर्ती उभ्या केल्या आहेत. एक हजाराच्या आसपास लोकसंख्या असलेले हे गाव आहे. नांदुर ढोक व बाभूळगाव गंगा या दोन पंचायत मिळून या गावाचा कारभार चालतो, असे परदेशी यांनी सांगून १९७१ साली ट्रस्टची स्थापना करण्यात आली. कर्नाटक व महाराष्ट्रातील भाविक भक्तांनी सुमारे एक कोटी रुपये खर्चून येथे मंदिर उभारले आहे. चिदंबर स्वामींनी राजाराम महाराजांना स्वत:चा शेला म्हणून दिला होता. त्यावर बारा पावले ठोसपणे उमटलेली आहेत, असा इतिहास बाभूळगाव गंगा येथे पाहायला मिळतो. तो शेला तेथे आजही येथे पहावयास उपलब्ध आहे. वैजापूर पासून वीस किलोमीटर अंतरावर आहे. प्रकाशनाची अपेक्षा श्री. परदेशी यांनी या दोनशे ग्रंथांच्या संदर्भात पुरातत्त्व खात्याकडे व काही जाणकार मंडळी कडे पाठपुरावा केला मात्र त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. या ग्रंथांचे संगणकीकरण व्हावे व त्याचे मोठय़ा स्वरूपात प्रकाशन व्हावे, अशी त्यांची मनोमन इच्छा असून ट्रस्टकडे असलेल्या चार एकर सोळा गुंठे परिसरात हे मंदिर आज उभे आहे.