महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्ष विखुरलेला असतानाच आघाडी सरकारमध्ये वेगवेगळी मंत्रिपदे भूषविणारे राजेंद्र दर्डा अलिप्तवादी भूमिकेत आहेत. ते प्रचारात का नाहीत, या बाबत प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना विचारले असता ते म्हणाले, ‘ते प्रचारात नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. मध्यंतरी आमचे बोलणेही झाले होते, पण तरीही त्यांनी अलिप्तवादीच भूमिका ठेवली आहे.’ पक्षदेखील त्यांना शोधतो आहे का असे विचारले असता, तसे काही नाही असे उत्तर देत दर्डाच्या अलिप्तवादावर चव्हाणांनी मौनच पाळले.महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसचे वरिष्ठ नेते फारसे लक्ष देत नाहीत, अशी तक्रार प्रत्येक वॉर्डात होत आहे. अगदी प्रचारसाहित्यही मिळाले नाही, असे सांगत नेते लक्षच देत नाहीत. कार्यकर्त्यांनी कुठपर्यंत पळायचे, असा प्रश्न विचारला जात होता. प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर काँग्रेस महापालिकेच्या निवडणुका अधिक सक्षमपणे लढेल, असे अशोक चव्हाण यांनी सांगितले होते. त्यानंतर त्यांनी औरंगाबाद शहरात शुक्रवारी हजेरी लावली. दोन ठिकाणी जाहीर सभाही घेतल्या. महापालिकेत काँग्रेसला सत्ता मिळाल्यास पाणीपुरवठय़ाचा रखडलेला प्रश्न मार्गी लावू, असेही ते म्हणाले. मात्र, या निवडणुकीत आघाडी सरकारच्या कार्यकाळात मंत्रिपद भूषविलेले राजेंद्र दर्डा का नाहीत, असे विचारले असता त्यावर अशोकरावांनी विस्ताराने बोलणे टाळले. मात्र, दर्डा यांनी प्रचारात यावे यासाठी पूर्वी बोलणे झाले होते. अलिकडे मात्र तसे बोलणे झाले नाही, असे ते म्हणाले.पराभवानंतर अलिप्तच*आघाडी सरकारच्या कार्यकाळात १९९९ ते २००४ दरम्यान राजेंद्र दर्डा ऊर्जा, वित्त व नियोजन, पर्यटन या विभागांचे राज्यमंत्री होते. *२००९-१०मध्ये ते उद्योगमंत्री होते आणि नंतर त्यांनी शिक्षणमंत्री म्हणून काम केले. गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा दणदणीत पराभव झाला, तेव्हापासून ते काँग्रेसपासून फटकून वागत आहेत. *व्यवसायाची वेगळी जबाबदारी स्वीकारली असल्याने पक्षीय राजकारणात ते दिसत नसल्याचे त्यांचे समर्थक सांगतात. *मंत्रिपदे मिळविल्यानंतरही मतदारसंघातील महापालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारातून ते गायब आहेत.