सगळी सत्व परीक्षा मराठा समाजानेच द्यावी अशी भूमिका काही विचारवंतांनी घेतली असून हे चुकीचं आहे. प्रत्येक वेळी मराठा समाज समन्वयाची भूमिका घेणार नाही. आधीच मराठा समाजाची अवस्था कपाळावर कुंकू असूनही विधवेसारखी झाली आहे. अशी उद्विग्न प्रतिक्रिया मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राजेंद्र कोंढरे यांनी दिली आहे. कोल्हापुरात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. MPSC मध्ये यशस्वी होणारे तरुण केवळ एक टक्का आहेत. खासगी क्षेत्रात तरुणांना संधी मिळावी यासाठी राज्य सरकारने प्रयत्न करावेत. बंद असलेली सारथी संस्था पुन्हा मजबूत करावी अशीही मागणी यावेळी राजेंद्र कोंढरे यांनी केली आहे. टीव्ही नाइनने यासंदर्भातले वृत्त दिले आहे. आणखी वाचा- “जास्त चर्चा करु शकत नाही,” मुख्यमंत्र्यांच्या निर्णयावर भुजबळ नाराज? राज्य शासनाने MPSC ची परीक्षा पुढे ढकलण्याचा जो निर्णय घेतला त्याचे आम्ही स्वागत करतो. या परीक्षेसाठी २ लाख ६० हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केले असंही त्यांनी सांगितलं. मराठा समाजातील विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षा एवढेच ध्येय न बाळगता अनेक क्षेत्रातील संधींकडे लक्ष द्यावं असंही आवाहन त्यांनी केलं. मराठा समाजातील गर्भश्रीमंत व उच्च मध्यमवर्गीयांनी मराठा समाजातील विद्यार्थ्यांना मदतीचा हात देण्याची भूमिका स्वीकारली पाहिजे. अन्यथा भविष्यात रोजगार नसलेली पिढी हातात दगड घेऊन व्यवस्थेच्या विरोधात उभी राहिल असंही राजेंद्र कोंढरे यांनी म्हटलं आहे. आणखी वाचा- ‘एमपीएससी’ परीक्षांबाबत अगोदरच निर्णय घ्यायला हवा होता; हे सरकार दिशाहीन आहे – चंद्रकांत पाटील प्रकाश आंबेडकर यांनी छत्रपती घराण्याबाबत आदर ठेवायला हवा. आदर ठेवण्यात प्रकाश आंबेडकर कमी पडत असल्याचं दिसतं आहे. प्रकाश आंबेडकर यांनी उदयनराजे आणि संभाजीराजेंवर केलेल्या टीकेवर राजेंद्र कोंढरे यांनी मत त्यांचं मत मांडलं. सारथी या संस्थेचं उपकेंद्र कोल्हापूरला झालं पाहिजे. आरक्षणाची चोरी होते आहे उघड आहे. मात्र राजकारणामुळे हे दाबलं जातं आहे. त्यामुळे मराठा समाज भरडला जातो आहे असंही त्यांनी म्हटलं आहे.