छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या राज्याची पहिली राजधानी असणारा राजगड आणि कार्ला येथील एकविरा देवीचे मंदिर येथे जाण्यासाठी रोप वे बांधण्याचा निर्णय गेल्या आठवड्यात राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थित झाला. या दोन्ही ठिकाणी 'रोप वे' बांधण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या पर्यटन खात्याने पुढाकार घेतल्यामुळे राज्यात एका नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे. राजगडावर रोप वे बांधण्याच्या वृत्तानंतर दुर्गप्रेमींकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. रोप वे झाल्यानंतर राजगडावर येणारा ताण विचारात घेता राजगडाचा सिंहगड करू नका, असे आवाहन दुर्गप्रेमींनी केले आहे. यामुळे वाढणाऱ्या पर्यटनाच्या माध्यमातून राजगडाला धोका निर्माण होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकल्पाचा विचार करावा असे आवाहन दुर्गप्रेमींनी केले आहे. अनेक दुर्गप्रेमी मंडळे, संस्था तसेच गिर्यारोहक आणि इतिहासप्रेमींनी या योजनेला विरोध दर्शवला आहे. एकविरा देवीच्या 'रोप वे'पेक्षा राजगडावरील प्रस्तावित रोप वेला अधिक विरोध करण्यात येत आहे. त्यातच आता पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी एका छोट्या दुर्गप्रेमीने पत्र लिहिले आहे. पत्रात या लहान मुलीने आदित्य ठाकरेंकडे रोप पे प्रकल्प बांधू नका अशी केविलवाणी विनंती केली आहे. एकविरा देवी मंदिर आणि राजगड किल्ल्यावर ‘रोप वे’नं जाता येणार; ठाकरे सरकारनं घेतला निर्णय माननीय आदित्य दादा यांना पत्रास कारण की राजगडावर रोप वे बांधू नका. कारण गडावर आजूबाजूला फुलपाखरु, हरण, मोर, ससे यांची घरे असतात. आपण गर्दी केली हे सगळे तिथून निघून जातील. त्यांना त्यांच्या घराबाहेर काढू नका Please. मला ट्रेकिंगला गेल्यावर त्यांना लपून पाहायला, फुलपाखरामागे धावायला आवडतं. आपण त्यांना आपल्या घरी राहू देत नाही. मग त्यांना त्यांच्या घरामधून बाहेर पाठवतो. मी एक छोटी गडप्रेमी आणि ट्रेकर साईषा अभिजीत धुमाळ पुणे, असे या पत्रात म्हटले आहे. या लहान गडप्रेमी मुलीने पर्यावरणाचे महत्त्व अधोरेखित करत रोप वे मुळे कसे नुकसान होऊ शकते हे आपल्या पत्रातून मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले आहे. सध्या हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चर्चा करुन निर्णय घेऊ - अजित पवार दरम्यान, रोप वे बांधण्याच्या निर्णयानंतर अनेक गडप्रेमी संघटनांनी याला विरोध केला आहे. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रकल्पाला विरोध करणाऱ्यांना सुनावले आहे. “सिद्धटेक जीर्णोद्धार असो किंवा रायगड रोप वे या कामांना देखील सुरुवातीला विरोध झाला. मात्र कोणताही निर्णय घेताना तो सर्वसमावेशक असावा याचा विचार केलेला असतो. कधीकधी वयोवृद्ध माणसांना देखील शिवाजी महाराजांचा इतिहास जाणून घेण्याकरता ऐतिहासिक गड किल्ल्यांना भेटी द्याव्या वाटतात. त्यांच्यासाठीच रोप वेचा पर्याय आहे पण एक लक्षात घेतले पाहिजे, आज जे राजगड रोप वेला विरोध करत आहेत किंवा चढून गडांवर जात आहे. कधीतरी तेसुद्धा ६० वर्षांचे होणार आहेत. तरीसुद्धा ज्यांचा विरोध आहे त्यांच्याशी चर्चा करुन निर्णय घेऊ,” असे अजित पवारांनी म्हटले होते.