कडकनाथ कोंबडी घोटाळ्यातील आर्थिक गैरव्यवहाराचा अंमलबजावणी संचलनालयाकडून (ईडी) तपास केला जावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी केली आहे. शेट्टी यांनी आज मुंबईमधील ईडी कार्यालयात जाऊन यासंदर्भातील ईडीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करुन या प्रकरणात चौकशी करण्याची मागणी केली आहे.

‘कडकनाथ कोंबडी पालन’ व्यवसायात गुंतवणूक केल्यास भरघोस नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून ‘महारयत अ‍ॅग्रो इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी’ने राज्यभरातील शेतकऱ्यांची मोठय़ा प्रमाणावर फसवणूक झाल्याचे प्रकरण पुढे आले असून कंपनीच्या संचालक मंडळवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कंपनी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या नातेवाईकांची असल्याचा आरोप करीत शेट्टी यांनी हे प्रकरण स्वाभिमानीच्या वतीने धसास लावण्याचा इरादा व्यक्त केला आहे. तर, खोत यांनी याचा इन्कार केला असून शेट्टी खोटी माहिती पसरवत असल्याचे नमूद केले आहे. कंपनीशी संबंधित लोक आपले नातेवाईक असल्याचे शेट्टी यांनी सिद्ध करून दाखवावे असंही खोत यांनी म्हटले आहे.

काय आहे प्रकरण

कडकनाथ कोंबडी पालनात गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवून राज्यातील अनेकांची फसवणूक करण्यात आल्याचे प्रकरण उजेडात आले असताना शहरातील ६६ जणांना पावणेदोन कोटी रुपयांना गंडा घालण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी महारयत अ‍ॅग्रो इंडिया प्रा. लि. तसेच रयत अ‍ॅग्रो इंडिया या कंपनीच्या संस्थापक, संचालक, लेखापाला विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी प्रीतम माने याला अटक करण्यात आली असून कंपनीचे अध्यक्ष सुधीर शंकर मोहिते, संचालक संदीप सुभाष मोहिते (दोघे रा. इस्लामपूर, जि. सांगली) यांच्यासह हनुमंत शंकर जगदाळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. नीलेश शिवाजी आंबेडे (वय ३५,रा. धनलक्ष्मी सोसायटी, दत्तवाडी) यांनी यासंदर्भात दत्तवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

नक्की वाचा >> राजू शेट्टी- सदाभाऊ खोत यांच्यात ‘कडकनाथ कोंबडी घोटाळ्या’वरुन पुन्हा संघर्ष

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कडकनाथ कोंबडी पालनाच्या व्यवसायात गुंतवणूक केल्यास जादा परतावा मिळेल, असे आमिष महारयत अ‍ॅग्रो कंपनीकडून दाखविण्यात आले होते. तक्रारदाराकडून अडीच लाख रूपये स्वीकारण्यात आले होते. रक्कम स्वीकारल्याची पावती तक्रारदाराला देण्यात आली होती. करारानुसार अटी आणि शर्थीचे पालन कंपनीकडून करण्यात आले नाही. त्यामुळे अंबोडे यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. दरम्यान, महारयत अ‍ॅग्रो इंडिया कंपनीकडून अंबोडे यांच्यासह ६६ जणांची फसवणूक करण्यात आल्याचे उघडकीस आले. अंबोडे तसेच अन्य तक्रारदारांकडून १ कोटी ७३ लाख १९ हजार रुपये घेण्यात आले होते. फसवणूक प्रकरणी नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर कंपनीतील लेखापाल प्रीतम मानेला अटक करण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक शंकर सलगर तपास करत आहेत.