कांद्याची आयात आणि राज्यभरात कांद्यांच्या घसरलेल्या भावावरून नाशिक येथे ९ सप्टेंबरपासून केंद्र सरकारविरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी रविवारी दिला. केंद्र सरकारने कांद्याच्या आयातीवर त्वरित बंदी घालावी, तसेच कांदा निर्यातीसाठी शेतकऱ्यांना अनुदान द्यावे, अशी मागणीदेखील राजू शेट्टी यांनी केली. स्वाभिमानी शेतकरी संघटना महाराष्ट्रातील महायुतीच्या घटकपक्षांचा भाग असल्यामुळे विधानसभेच्या तोंडावर महायुतीच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे. केंद्र सरकारने महाराष्ट्रातील शेतक-यांच्या प्रश्नांची योग्य ती दखल न घेतल्यास आगामी विधानसभा निवडणुकीत याचा फटका पडू शकतो असा इशाराही राजू शेट्टी यांनी दिला.