महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, ठाणे अशा मोठ्या शहरांमध्ये संपूर्ण देशातून लोक येऊन वास्तव्य करत असतात. लोकांना तिथे आपलं घर निर्माण करुन वास्तव्य करण्याची संधी देऊन चूक केलीये का ? अशी विचारणा राष्ट्रवादी काँग्रसचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी राज्यसभेत केली आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी १५ सप्टेंबरला करोनाशी लढा देण्यासाठी सरकारने केलेल्या उपयायोजनांची माहिती दिली होती. त्यावरील चर्चेदरम्यान प्रफुल्ल पटेल बोलत होते. यावेळी त्यांनी अप्रत्यक्षपणे कंगनाच्या वक्तव्यावरुन सुरु असलेल्या वादावर भाष्य केलं. "आमच्या राज्याला कोणीही येऊन काहीही बोलल्यावर आम्ही सहन करावं का?," असा संतप्त सवाल यावेळी त्यांनी विचारला. "महाराष्ट्राबद्दल बोलायचं गेल्यास मुंबई, पुणे, ठाणे या मोठ्या शहरांमध्ये करोनाची गंभीर परिस्थिती आहे. संपूर्ण देशातील लोकांना तिथे घर निर्माण करण्याची संधी देऊन या शहरांनी चूक केली आहे का? त्यांच्यावर टीका होणार का? आमच्या राज्याला कोणीही येऊन काहीही बोलल्यावर आम्ही सहन करावं का?," असं प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलं आहे. "करोनाविरोधील लढाईची सुरुवात केंद्राच्या आदेशाचं पालन करतच सर्व राज्यांनी केली. आता अनलॉक प्रक्रियादेखील केंद्रीय गृहमंत्रालयाकडून येणाऱ्या गाइडलान्सनुसारच होत आहे. जर आपण सर्वजण एकत्र लढत आहोत तर आरोप-प्रत्यारोप करण्याची गरज नाही," असं मत प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केलं. Rajya Sabha member @praful_patel's Remarks | Discussion on COVID-19 & Steps Taken By Govt — Rajya Sabha TV (@rajyasabhatv) September 17, 2020 पुढे ते म्हणाले की, "आज अनेक समस्या आहेत. ऑक्सिजन सिलेंडर आणि रेमिडीसेवेरची कमतरता आहे. सामूहिकपणे याचा सामना न केल्यास समस्या मोठ्या प्रमाणात वाढू शकते. राज्य सरकारांकडे आज निधीची कमतरता असून त्याची अनेक कारणं आहेत. केंद्राकडून मिळणारा जीसीटी अद्याप मिळालेला नाही".