आमच्यासारखे लोक संसदेत गेल्याशिवाय तेथे झोपलेल्या लोकांच्या झोपा उडणार नाहीत. त्यांच्या झोपा उडवण्यासाठी मला संसदेत जायचे आहे. लोकांसाठी मी जीव देईन. त्यांनी मला त्यांचे अनमोल मत द्यावे, असे बॉलिवूडची आयटम गर्ल राखी सावंत हिने शिर्डी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.
राखी सावंतने आज शिर्डीत साई दरबारात येऊन बाबांना यशासाठी साकड घातले. सध्या राखी सावंत अपक्ष असली तरी पक्षाच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढविण्याचे संकेत मिळत आहेत. येत्या दोन दिवसांत दक्षिण मुंबईतून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे राखीने स्पष्ट करत पक्षाबाबत मात्र गुपित ठेवले. उद्यापर्यंत ते सर्वाना समजेल, सकाळीच हा धमाका होईल असे ती म्हणाली.
चित्रपटसृष्टी सोडून तुम्ही निवडणुकीकडे का वळालात यावर राखी म्हणाली, याबाबत बरेच काही बोलण्यासारखे आहे, पण बाबांच्या मंदिरात आले असल्याने दुस-यांबद्दल बोलायला मर्यादा आहेत. परंतु मला जनतेची सेवा करायची आहे. महाराष्ट्र पोलीस आणि एसटी कर्मचारी यांच्या प्रश्नासाठी मी लढा दिला आहे, पुढेही लढणार आहे. देशाचा पतंप्रधान कुणीही होवो, तो जनतेसाठी काय करतो हे पाहणे महत्त्वाचे आहे. मी निवडणूक निश्चित लढवणार आहे. मी मुंबईची मुलगी आहे, मला कोणीही रोखू शकत नाही असेही राखीने सांगितले.