कामगार नेते कॉ. गोिवद पानसरे व त्यांच्या पत्नीवर झालेल्या हल्ल्यातील आरोपींना अटक करण्यात पोलिसांना अपयश येत आहे, याच्या निषेधार्थ कम्युनिस्ट पक्षातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर बुधवारी मोर्चा काढण्यात आला.
हल्लेखोरांना तत्काळ अटक करा, जातीयवादाचे विष पसरविणाऱ्या संघटना आणि विचार दाबण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रवृत्तींना पायबंद करावा, अशी एकमुखी मागणी करण्यात आली. सरकारविरोधी घोषणांनी नगर रस्ता दणाणून गेला होता. भारतीय कम्युनिस्ट पक्ष व डाव्या विचारसरणीच्या कार्यकर्त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून हा मोर्चा काढला. दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा धडकला. कॉ. पानसरे यांच्यावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांना जेरबंद करण्यास पोलीस अपयशी ठरल्याबद्दल संताप व्यक्त करण्यात आला. पुरोगामी व परिवर्तनवादी विचार करणाऱ्यांचा आवाज दाबला जात आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येनंतर कॉ. पानसरे दाम्पत्यावरील हल्ला याच विचारसरणीचा असल्याचा संशय व्यक्त करीत सरकारने निरपेक्ष भावनेने हल्लेखोरांना जेरबंद करावे. या बरोबरच पानसरे दाम्पत्याला उच्च दर्जाचे संरक्षण द्यावे. अशी मागणी करण्यात आली. मोर्चात प्रा. पी. बी. सावंत, प्रा. सुशीला मोराळे, प्रा. सर्जेराव काळे, कॉ. नामदेव चव्हाण, कॉ.करुणा टाकसाळ आदींचा सहभाग होता.