'राम जन्मला गं सखे राम जन्मला' गीत रामायणातल्या या अजरामर शब्दांनी मराठी मनांमध्ये रामायणाचं आणि रामनवमीचं महत्त्व बिंबवलंय. चैत्र शुद्ध नवमीला भारतातल्या सर्व भाषांमधल्या कथा आणि गीतांमधून गोडवे गायल्या गेलेल्या श्रीरामाच्या जन्माचा हा दिवस. या दिवशी दुसऱ्या प्रहराला श्रीरांमचंद्र जन्माला आले आणि भारतवर्षाला आनंद झाला असं रामायणामध्ये म्हटलंय. आजही रामनवमी भारतातल्या अनेक ठिकाणी आनंदात साजरा केली जाते. अयोध्या, सीतामढी अशा उत्तर भारतातल्या शहरांपासून ते दक्षिणेस रामेश्वरमपर्यंत श्रीरामाच्या मंदिरांमध्ये रामजन्मसोहळा साजरा केला जातो. देशात लाखोजण मंदिरांमध्ये जात रामाची पूजा करतात. तर अनेकजण घरातही रामाची पूजा करतात. यावेळी देशात अनेक ठिकाणी रामाची पूजा केली जाते. अनेक भक्त तान्हुल्या बाळाच्या स्वरूपातली रामाची मूर्ती खरेदी करत त्याचा पाळणा सजवतात. या मूर्तीला प्रेमाने स्नान घालत त्याला कपडे घातले जातात. आणि त्याची मनोभावे पूजा केली जाते रामकथा परंपरेने भारताच्या जवळपास सगळ्याच भाषांमध्ये आहेत. रामनवमीच्या निमित्ताने या रामकथांचं पठण केलं जातं. तसंच भजन, कीर्तन असेही कार्यक्रम आयोजित केले जातात. रोजच्या आयुष्यातले चार क्षण बाजूला काढून या कीर्तन आणि भजनाला गावकरी आणि शहरवासीयसुध्दा चांगली हजेरी लावतात. महाराष्ट्रातही साताऱ्यातल्या चाफळमधील राम मंदिरात आणि नाशिकच्या काळाराम मंदिरांमध्ये रामनवमीचा उत्साह असतो. नाशिकचं काळाराम मंदिर हे तिथलं एक महत्त्वाचं श्रद्धास्थान आहेच पण त्याचसोबत 'काळाराम मंदिर' सत्याग्रहामुळे महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनातही या मंदिराला महत्त्व आहे. १९३० साली दलितांना या मंदिरात प्रवेश मिळावा, यासाठी भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर याच्या नेतृत्त्वाखाली दलितांनी सत्याग्रह केला होता. महाराष्ट्रातल्या सामाजिक घुसळणीमध्ये काळाराम मंदिराचं स्थान वादातीत आहे. भगवंत कुठे आहे याचं उत्तर त्याची मनोभावे पूजा करणाऱ्या भक्तालाच माहिती असते. कुणाला तो मूर्तीत दिसतो. तर कुणाला तो समाजाच्या प्रत्येक अंशात दिसतो. अनेकांना तर तो चराचरांत दिसतो. तुम्हाला सगळ्यांना रामनवमीच्या शुभेच्छा