मी असेपर्यंत खुशाल गायी कापा असं वक्तव्य भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केलं आहे. रावसाहेब दानवे यांचे प्रचारसभेतले एक भाषण व्हायरल झाले आहे. या भाषणात मी असेपर्यंत बिनधास्त गोहत्या करा असे वक्तव्य करताना ते दिसत आहेत. केंद्र सरकारने गोहत्या बंदीचा कायद्याची देशभरात अंमलबजावणी केली. मात्र त्यांच्याच सरकारमधले मंत्री आता हे वक्तव्य करत आहेत. जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात प्रचार करताना ते असं बोलले आहेत. यासंदर्भातली एक व्हिडीओ क्लीपही सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे. दरम्यान हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मी अशाप्रकारचे कोणतेही वक्तव्य केलेले नाही असं रावसाहेब दानवेंनी म्हटलं आहे. इतकंच नाही तर जो व्हिडीओ व्हायरल होतो आहे त्यासोबत कोणीतरी छेडछाड केली असावी असंही त्यांनी स्पष्ट केलं. १९ ऑक्टोबर रोजी रावसाहेब दानवे यांनी कठोरा बाजार या ठिकाणी मुस्लिम बांधवांची सभा घेतली. या सभेत रावसाहेब दानवे यांनी जे वक्तव्य केलं त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या भाषणात रावसाहेब दानवे म्हणतात " केंद्र सरकारने गोहत्या बंदी लागू केली तेव्हा यांच्यापैकी काही लोक माझ्याकडे आले. बकरी ईद आली आहे साहेब आता कसं करायचं? मी म्हटलं काय झालं? तर ते म्हणाले अहो ते गोहत्या बंदी आहे ना, मी त्यांना म्हटलं मी असेपर्यंत खुशाल गायी कापा" हे वक्तव्य असलेलं त्यांचं भाषण व्हायरल झालं आहे. एवढंच नाही तर आपल्या तालुक्यात दोन नंबरचे धंदे सुरु आहेत तुम्ही म्हणत असाल तर दोन मिनिटात ते बंद करतो असंही रावसाहेब दानवे म्हणाले आहेत. मात्र रावसाहेब दानवे यांनी या वक्तव्याबाबत कानावर हात ठेवले आहेत. काहीजणांनी खोडसाळपणा केला आहे. व्हिडीओ चुकीच्या पद्धतीने एडिट करुन व्हायरल केला आहे असा आरोप दानवे यांनी केला. तसेच मी असे बोललोच नाही असेही त्यांनी म्हटले आहे. मात्र त्यांच्या या वक्तव्याचे पडसाद सोशल मीडियावर चांगलेच उमटले आहेत. अनेकांनी त्यांच्या या वक्तव्यावर टीका करत त्यांच्यावर पातळी सोडून निशाणाही साधला आहे.