सांगली : मोदी आणि फडणवीस सरकारने विकासकामांचा डोंगर उभारला असून जनतेचा विश्वासही जिंकला आहे हे आतापर्यंतच्या निवडणूक निकालाने स्पष्ट केले आहे. तरीही सर्वच विरोधक एकवटले असून भाजपच्या कार्यकर्त्यांनी अधिक सावध होऊन याचा मुकाबला करावा असे आवाहन पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सांगितले.

लोकसभा निवडणूक आणि पक्षाध्यक्ष अमित शहा यांचा सांगली दौरा पुढील आठवडय़ात होत आहे. या पाश्र्वभूमीवर दानवे यांनी सांगलीत पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, आ. सुधीर गाडगीळ, आ. शिवाजीराव नाईक, आ. विलासराव जगताप, प्रदेश चिटणीस मकरंद देशपांडे, रवी अनासपुरे, विजय पुराणिक, महापौर संगीता खोत, नीता केळकर, सुरेंद्र चौगुले आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना दानवे यांनी सांगितले की, पक्षाच्या माध्यमातून चांगली कामे झाली आहेत. जनतेचाही भाजपवर विश्वास आहे. यामुळेच राज्यात झालेल्या वेगवेगळ्या ठिकाणच्या निवडणुकीत भरघोस यश मिळाले आहे.

मुंबईसह पुणे, नागपूर येथील मेट्रो, कोस्टल रोड, विमानतळ, राष्ट्रीय महामार्गाचे जाळे, शेतकऱ्यांची कर्जमाफी, मागेल त्याला शेततळे, मुबलक खतपुरवठा, पीक विम्याची बदललेली पध्दत आणेवारीत सुधारणा या सरकारच्या जमेच्या बाजू आहेत. यामुळे सामान्य लोकांमध्ये भाजपबद्दल विश्वासाचे वातावरण आहे. याचा धसका विरोधकांनी घेतला असून सर्व विरोधक एकवटले असल्याने कार्यकर्त्यांनी अधिक सावध राहायला हवे. स्वतला निवडणूक मोडमध्ये अपडेट करावे असे सांगून अमित शहा यांच्या दौऱ्यावेळी जोरदार शक्तिप्रदर्शन करावे असे म्हणाले.

दरम्यान, या बठकीस खा. संजयकाका पाटील आणि आ. सुरेश खाडे गैरहजर होते. याबाबत कोणीही गैरसमज करू नये असे सांगून त्यांनी याबाबत पूर्व परवानगी घेतली असल्याचे  ते म्हणाले.