समाज गायीच्याबाबतीत जागृत झाला, तर कोणीही गाय कापायला पाठवणार नाही. कत्तल खान्यापर्यंत गाय पोहोचवणारे ठेकेदार हिंदू असतात, असं वक्तव्य सरसंघचालक मोहन भागवत यांनी पुण्यात केलं आहे. जेव्हा गायीचं वैज्ञानिक महत्व समजेल, त्यावेळी गायी कत्तलखान्यापर्यत जायच्या नाहीत, असेही ते म्हणाले.

गो विज्ञान संशोधन संस्था आणि श्रद्धेय मोरोपंत पिंगळे गो सेवा पुरस्काराचे वितरण सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी विविध संस्था आणि व्यक्तींना भागवतांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि गो विज्ञान संशोधन संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.

या पुरस्कार कार्यक्रमावेळी मोहन भागवत हे बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, ‘गाय कापली जाते ही समस्या नाही, तर गायीला आपण माता मानत असताना. कोणी गाय पाळायला तयार नाही, ही समस्या आहे.’ प्रत्येक घर गो पालक झाले पाहिजे आणि प्रत्येक घर गायीचं संरक्षक बनले पाहिजे, असे अवाहन यावेळी भागवत यांनी केलं.

तसेच ते पुढे म्हणाले की, भारतातील सर्व समाज गायी प्रति जागृत झाला, तरच गायीची समस्या मुळापासून संपुष्टात येईल. गोसंवर्धन, गोपालन कसे करायचे याचं उदाहरण आम्हाला उभे करायचे आहे. त्यासाठी सगळ्यांनी एकत्रित आणि सर्वंकष प्रयत्न करणं गरजेचं आहे.