परतीच्या पावसानं राज्यात प्रचंड धुमाकूळ घातला होता. अनेक भागात अतिवृष्टी झाल्यानं पिकांचं मोठं नुकसान झालं होतं. अतिवृष्टी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्याची घोषणा राज्य सरकारनं केली होती. अखेर त्यासंदर्भात निर्णय झाला असून, दिवाळी आधी सरकारकडून शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याचे मदत व पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी यांची माहिती दिली.

राज्यात ऑक्टोबर महिन्यात प्रचंड पाऊस झाला. ऐन काढणीवर आलेली पिकं भुईसपाट झाली होती. अनेक भागात तर पिकंच वाहून गेली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह मंत्र्यांनी विविध भागांचे दौरे केले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शक्य तितकी मदत राज्य सरकारकडून केली जाईल, असं आश्वासन मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिलं होतं. अखेर त्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे.

राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज पार पडली. या बैठकीनंतर मदत व पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या मदतीबद्दलची माहिती दिली. वडेट्टीवार म्हणाले, राज्य सरकारनं शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत करण्याचं वचन दिलं होतं. ते सरकार पूर्ण करत आहे. निवडणूक आयोगाला मदत वाटपासंदर्भात पत्र देण्यात आलं आहे. अशा प्रकरणात निवडणूक आयोगाकडून परवानगी मिळालेली आहे. त्यामुळे सोमवारपासून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्यास सुरूवात होईल,” असं वडेट्टीवार म्हणाले.

राज्यातील परतीच्या पावसानं अनेक भागात झालेल्या नुकसानीची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दौरे करत पाहणी केली होती. पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यातील नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांनी मदत करणार असल्याचं सांगत शेतकऱ्यांना धीर दिला होता.