केंद्र सरकारने केलेल्या रेल्वे प्रवासी भाडेवाढीचा परभणी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन तीव्र निषेध करण्यात आला.
परभणी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुरेश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून त्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. केंद्र सरकारने अचानकपणे रेल्वे प्रवासी भाडे तसेच माल वाहतूक भाडेवाढ केली आहे. या दरवाढीमुळे सामान्य माणूस वेठीस धरले जात आहे. या भाडेवाढीमुळे सामान्य माणूस महागाईने होरपळून निघेल. या भाडेवाढीचा तीव्र निषेध करण्यात आला. तसेच रेल्वे प्रवासी भाडे तसेच माल वाहतूक भाडेवाढ विनाविलंब रद्द करावी, ही मागणी करण्यात आली. या वेळी मनपातील विरोधी पक्षनेते भगवान वाघमारे, परभणी बाजार समितीचे उपसभापती आनंद भरोसे, नदीम इनामदार, बाळासाहेब देशमुख, पंजाब देशमुख आदी उपस्थित होते.