राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर राष्ट्रीय वारकरी परिषदेने गंभीर आणि खळबळजनक आरोप केला आहे. “शरद पवार हे हिंदूविरोधी आहेत. त्यांना वारकऱ्यांच्या कोणत्याही कार्यक्रमाला बोलवू नका,” असं पत्रकच राष्ट्रीय वारकरी परिषदेनं जारी केलं आहे. पवार हे हिंदूविरोधी असल्याने त्यांना कोणत्याही कार्यक्रमाला बोलावले जाऊ नये असंही या पत्रामध्ये म्हटलं आहे. यावरुन आता नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

वारकरी परिषदेचे वक्ते महाराज यांनी हे पत्रक जारी केलं आहे. यामध्ये त्यांनी शरद पवार हे नेहमीच हिंदू धर्माला विरोध करतात असा आरोप केला आहे. ‘पवार हे हिंदू धर्माला विरोध करतात. ते रामायणाला विरोध करतात. पवार नास्तिक मंडळींना पाठिंबा देतात. त्यामुळेच त्यांना यापुढे वारकऱ्यांच्या कुठल्याही कार्यक्रमाला बोलवण्यात येऊ नये,’ अशा आशयाचं पत्रक महाराजांनी जारी केलं आहे.

नक्की वाचा >> शरद पवारांना हिंदूविरोधी म्हणणाऱ्या वारकरी परिषदेला आव्हाडांनी फटकारले; म्हणाले…

वक्ते महाराजांना २०१८ सालचा महाराष्ट्र सरकारकडून देण्यात येणारा ‘ग्यानबा तुकाराम पुरस्कार’ मिळालेला आहे. त्यांची हिंदुत्वावादी संघटनांशी जवळीक असल्याची चर्चा नेहमीच होत असते. हिंदुत्ववाद्यांबरोबर काम करणारे म्हणून वारकरी संप्रदायामध्ये त्यांना ओळखले जाते. महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या भागात असणाऱ्या वारकऱ्यांवर वारकरी परिषदेचा प्रभाव आहे. खास करुन मुंबई, पुणे, मराठवाडा, विदर्भामध्ये वारकऱ्यांची संख्या मोठी आहे. म्हणूनच वक्ते महाराजांनी जारी केलेल्या या पत्रकामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.