कोल्हापूर शहराच्या नागरी समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी देशभरातील ६२२ स्टार्ट अप कंपन्यांकडून प्रतिसाद मिळाला. यापैकी सहा नाविन्यपूर्ण कल्पनांची प्रत्यक्ष कामासाठी निवड करण्यात आली आहे, अशी माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली.

कोल्हापूर इंक्यूबेशन सेंटर, डी वाय पाटील ग्रुप आणि आयआयटी कानपूरच्या स्टार्ट अप इंक्यूबेशन अँड इनोव्हेशन सेंटर (एसआयआयसी) यांचा संयुक्त उपक्रम असलेल्या उपक्रमचा शुभारंभ जानेवारीत झाला. पाणीपुरवठा व्यवस्थापन, कचरा व्यवस्थापन, हवेतील शुद्धता राखण्याचे नियोजन, शिक्षण, सार्वजनिक आरोग्य, इ- प्रशासन, कृषी व्यवस्थापन आणि वाहतूक याविषयांवर नवसंकल्पना अर्ज मागविण्यात आले होते. या मध्ये सहभाग नोंदविलेल्या ६२२ स्टार्टअप पैकी १२७ स्टार्टअप हे कोल्हापुरातील होते. तिसऱ्या फेरीनंतर सहा सर्वोत्तम नाविन्यपूर्ण नवसंकल्पना निवडण्यात आल्या.

कोल्हापूर स्टार्ट अप मिशनला मिळालेला प्रतिसाद पाहून आनंद झाला. आमदार ऋतुराज पाटील आणि महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या माध्यमातून या नवसंकल्पनांना सर्व प्रकारची प्रशासकीय आणि स्थानिक मदत दिली जाईल. हा उपक्रम देशातील नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणून नावारूपाला येईल, असा विश्वास आहे, असे मंत्री पाटील म्हणाले.