तब्बल पंधरवडय़ानंतर करवीर निवासिनी अंबाबाईच्या नव्या सुबक, प्रसन्न मुद्रेच्या मूर्तीचे दर्शन भाविकांना गुरुवारी दुपारी एक वाजल्यानंतर होणार आहे. केंद्रीय पुरातत्त्व विभागाच्या औरंगाबाद येथील पथकाने गेले १२ दिवस कौशल्य पणाला लावून मूर्तीला नव्या रूपामध्ये आणले आहे. पंधरा दिवसांपूर्वीची मूर्ती आणि आजची मूर्ती यामध्ये आमूलाग्र बदल घडला असून नव्या रूपाची छायाचित्रे पाहून भाविकही सुखावले आहेत. श्रीमंत शाहू महाराज यांच्या हस्ते महापूजा झाल्यानंतर भाविकांसाठी मूर्ती दर्शनाकरिता खुली केली जाणार आहे. महालक्ष्मीच्या मूर्तीवर रासायनिक प्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. या प्रक्रियेमधील कामाची दोन भागात विभागणी करण्यात आली. श्रीपूजकांना धार्मिक विधीचे हक्क देण्यात आले, तर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या खर्चातून केंद्रीय पुरातत्त्व विभागाने रासायनिक संवर्धन प्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. श्रीपूजकांनी २२ जुलपासून धार्मिक विधीला सुरुवात केली. २३ जुलला सुरू होणारी रासायनिक प्रक्रिया होऊ न शकल्याने भाविकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. दोन दिवसांच्या विलंबानंतर औरंगाबाद येथील पुरातत्त्व विभागाचे पथक डॉ. एम. एन. सिंग यांच्या नेतृत्वाखाली तसेच मंदिरात दाखल झाले. या पथकाने गेले १२ दिवस अविश्रांत परिश्रम करून मूर्तीला नवे रूप दिले आहे. १९५५ साली झालेल्या वज्रलेपामध्ये मूर्तीच्या अनेक गोष्टी झाकल्या गेल्या होत्या. करवीर निवासिनी अंबाबाईच्या मूर्तीचे दर्शन भाविकांना गुरुवारी घेता येणार आहे. मूर्तीचे रासायनिक संवर्धन प्रक्रियेनंतरचे (डावीकडील) आणि तत्पूर्वीचे रूप असे आहे. त्यातील सुबकता सहजपणे लक्षात येऊ शकते.