करोना विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने नागरिकांच्या हालचालीवर रोख लागण्यासाठी वाहतुकीवर प्रतिबंध लावण्यासंदर्भात आदेश जारी केला आहे.

जिल्ह्यात  संचारबंदी तसेच जमाव बंदीचे आदेश अंमलात असून संपूर्ण जिल्ह्यात सर्व प्रकारच्या वाहतुकीस रोख लावण्यासाठी स्थानिक निवासी भागात व वारंवार कामानिमित्त पालघर जिल्ह्यात प्रवास करण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. फौजदारी प्रक्रिया संहिता अंतर्गत कोणत्याही रस्त्यावर सार्वजनिक वाहतूक करण्यास याचबरोबर सायकलसह  पारंपारिक व अपारंपारिक इंधनावर चालणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना वाहतूकीसाठी मनाईचा आदेश पालघरचे जिल्हा न्यायदंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी जारी केला आहे.

पालघर जिल्ह्यातील वसई-विरार महानगरपालिका, पालघर नगरपरिषद क्षेत्र,  सफाळे व बोईसर ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये प्रवेश करण्यास मनाई आदेश जिल्हाधिकारी यांनी आज सायंकाळी निर्गमित केले. या आदेशान्वये सर्व व्यक्तींना कोणत्याही सार्वजनिक व खाजगी ठिकाणी तसेच परिसरातील रस्ते सार्वजनिक मार्ग इत्यादी ठिकाणी प्रवेश बंद करण्यात आला असून रस्त्यावर फिरणे, उभे राहणे, भटकणे असे कोणत्याही कोणतेही कृत्य करण्यावर मज्जाव करण्यात आला आहे. रस्त्यावर सार्वजनिक वाहतुकीवर प्रतिबंध लावण्यात आला असून हा आदेश  31 मार्च मध्यरात्रीपासून 14 एप्रिल मध्यरात्री पर्यंत जारी करण्यात आला आहे.