मुंबई:   राज्यात रेल्वेने येणाऱ्या प्रवाशांवर  निर्बध लागू करण्याचा निर्णय रविवारी सरकारने घेतला. त्यानुसार गोवा, के रळ, राजस्थान, गुजरात मधून येणाऱ्या रेल्वे प्रवाशांवर लक्ष  केंद्रीत करण्यात येणार असून त्यांना प्रवासापूर्वी ४८ तासापूर्वीची नकारात्मक करोना चाचणी  बंधनकारक करण्यात आली आहे.

या राज्यातून येणाऱ्या रेल्वे गाडय़ांची माहिती स्थानिक  आपत्ती व्यवस्थापण प्राधिकरणास  देण्याच्या सूचना  रेल्वेला देण्यात आल्या आहे. के रळ, गोवा, राजस्थान, गुजरात, दिल्ली आणि उत्तराखंड ही राज्ये करोनाच्या बाबतीत संवेदनशील प्रदेश म्हणून जाहीर करण्यात आली आहेत.  त्यामुळे या राज्यातून येणाऱ्या प्रवाशांना  आरक्षित तिकीटावरच प्रवास करता येईल.  या राज्यातून येणाऱ्या प्रवाशांची ४८ तासापूर्वीची आरटी-पीसीटी करोना चाचणी नकारात्मक असली पाहिजे.  ज्या प्रदेशातून रेल्वे राज्यात प्रवेश करेल, त्या रेल्वेतील प्रवाशांची यादी ते कोणत्या स्थानकावर उतरणार याचा तपशील चार तास अगोदर स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास कळविणे बंधनकारक आहे. राज्यात ज्या स्थानकावर हे प्रवाशी उतरतील तेव्हा त्यांच्याकडे करोना चाचची अहवाल नसल्यास लगेच प्रतीजन चाचणी करावी. त्यात नकारार्थी अहवाल येणाऱ्यांना १५ दिवस गृहअलगीकरण बंधनकारक करण्यात आले आहे.