आदिवासी समाजाच्या विकासासाठी राज्याच्या एकूण अंदाजपत्रकातील ९ टक्के निधी दिला जातो. परंतु, तो पुरेसा नसून त्यात वाढ होणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने राज्यपालांकडे ही मागणी  करण्यात आल्याचे प्रतिपादन आदिवासी विकासमंत्री मधुकर पिचड यांनी केले. आदिवासी विकास विभागातर्फे शिक्षक दिनानिमित्त येथे आयोजित शिक्षक व विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यात ते बोलत होते. आदिवासी विभागामार्फत विभागनिहाय पाच आदर्श शिक्षकांची निवड करून त्यांना प्रत्येकी एक लाख रुपये देण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
आदिवासी समाजाच्या विकासासाठी शिक्षण महत्वाचे आहे. आश्रमशाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक ते काम करत आहेत. शिक्षक पिढी घडविण्यासोबत विद्यार्थ्यांचे चरित्रबांधणीचे काम करत असतात. आदिवासी विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी काही आश्रमशाळांमध्ये सेमी इंग्रजी अभ्यासक्रम सुरू करण्याचा प्रयत्न सुरू आहे. सर्व आश्रमशाळांमध्ये व्यावसायिक शिक्षण देण्याचाही प्रयत्न आहे. आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे दार खुले व्हावे यासाठी महाराष्ट्रात एकलव्य आदिवासी विद्यापीठ सुरू करण्याचा मानस असल्याचे पिचड यांनी सांगितले. या वेळी नाशिक व ठाणे विभागातील आश्रमशाळेतील आदर्श शिक्षिकांसह इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेत विशेष प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला.