घरकुलधारकास मालमत्ता करात सवलत देण्याची शिफारस छतावरील पावसाचे वाया जाणारे पाणी साठविणारे संयंत्र शासनाने स्वीकृत केले. येथील वैद्यकीय मंचचे अध्यक्ष डॉ. सचिन पावडे यांनी तयार केलेल्या या संयंत्रास बसविणाऱ्या घरकुलधारकास मालमत्ता करात सवलत देण्याची शिफारस करण्यात आली आहे. जल पुनर्भरण क्षेत्रात गेल्या काही वर्षांपासून कार्यरत डॉ. सचिन पावडे यांनी माफक किमतीत तयार होणाऱ्या या संयंत्राची रचना केली आहे. स्वत:च्या रुग्णालयापासून त्याची सुरुवात करीत ही यंत्रणा बसविण्यास अनेकांना प्रोत्साहित केले. या आगळय़ा वेगळय़ा संयंत्राद्वारे पावसाचे लाखो लिटर पाणी साठवले जाऊ शकते. यंत्राद्वारे गाळप झाल्यानंतर पाणी पिण्यायोग्य होते. वाया जाणारे पाणी जागीच जिरविल्यास भूर्गभातील पाण्याची पातळी उंचावत असल्याचे दिसून आले आहे. या यशस्वी ठरलेल्या यंत्रणेबाबत गत हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत प्रात्यक्षिक दाखविण्यात आले होते. संयंत्राबाबत तांत्रिक क्षमता तपासण्यास भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा (पुणे) यांना सूचना करण्यात आली होती. या यंत्रणेने हे यंत्र उपयुक्त असल्याचा अभिप्राय दिला. याच अहवालाद्वारे राज्य शासनाने शासकीय पातळीवर त्याचा उपयोग करण्याचे ठरविले आहे. मुख्यमंत्र्यांचे अप्पर मुख्य सचिव प्रवीण परदेशी यांनी नगरविकास व ग्रामविकास खात्याकडे या संयंत्राची शिफारस करणारे पत्र दिले आहे. पावसाळय़ात घराच्या छतावर पडणारे पाणी वाया जाऊ न देता ते साठवून पिण्यासाठी उपयोगात आणणारी ही यंत्रणा आहे. ही यंत्रणा उपयोगात आणल्यास मुख्यत: दुष्काळग्रस्त भागात जलसंर्वधनाद्वारे किमान पेयजल टंचाई निश्चितच कमी करता येईल. या अनुषंगाने प्रधानमंत्री आवास योजना (शहरी व ग्रामीण) अंर्तगत राज्यातील शहरी व ग्रामीण भागात बांधण्यात येणाऱ्या घरकूल योजनांमध्ये या यंत्रणेचा वापर करण्याबाबत तपासणी करावी. तसेच या यंत्रणेचा वापर ज्या घरकुलधारकाकडून होईल, त्यांना ग्रामपंचायत, पालिका, किंवा महानगरपालिका क्षेत्रात आकारल्या जाणाऱ्या मालमत्ता करात सवलत देण्याबाबत विचार करावा, असेही मुख्य सचिवांनी सूचविले आहे. संपूर्ण तपासणीअंती हे मॉडेल स्वीकारण्यात आले असून त्याची व्यवहार्यता भूजल वैज्ञानिकांनी मान्य केली आहे. वध्रेतील काही नागरिकांनी ते घरावर बसवून पावसाच्या पाण्याचा पुरेपूर उपयोग केला. पाणी बचतीचा व पुर्नउपयोगाचा हा उपक्रम लोकचळवळ व्हावी. तसे झाल्यास महाराष्ट्रातील पाण्याची भूर्गभातील पातळी समाधानकारक राहील. वरिष्ठ भूजल वैज्ञानिकांनी सादर केलेल्या अहवालात या संयंत्राच्या फिल्टरला कमी जागा लागत असल्याचे नमूद करीत त्याद्वारे उपलब्ध पाणी पिण्यायोग्य असल्याचा निर्वाळा दिला आहे. पारंपरिक फिल्टरपेक्षा कमी किंमतीत उपलब्ध होत असल्याने सामान्यांना परवडू शकते. - डॉ. सचिन पावडे, अध्यक्ष, वैद्यकीय मंच, वर्धा