करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून लॉकडाउन आला आणि सर्वधर्मीय प्रार्थनास्थळं भाविकांसाठी बंद करण्यात आली. आता करोनापासून बचाव करण्यासाठी खबरदारी घेण्याचं आवाहन जनतेला केलं जात असून टप्प्याटप्प्याने अनलॉक केलं जात आहे. त्यात आता भाविकांसाठी मंदिर, मशीद,चर्च, गुरुद्वारा, बुद्धविहार खुली करावीत अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. रामदास आठवले यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवलं आहे.

मुस्लीम समाजाच्या वतीने रिपाइंचे अल्पसंख्यांक आघाडी मुंबई अध्यक्ष हसन शेख आणि अनिस पठाण यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने रामदास आठवले यांना निवेदन देऊन मशीद सुरु करण्याची मागणी केली. नुकतंच मुंबई उच्च न्यायालयाने जैन धर्मियांना आठवड्यातून दोन दिवस प्रार्थनास्थळ सुरू करण्याची परवानगी दिली असल्याची माहिती रिपाइं अल्पसंख्यांक आघाडीच्या शिष्टमंडळाने रामदास आठवले यांना दिली. त्यावर रामदास आठवले यांनी सर्वधर्मीय प्रार्थनास्थळं सुरू करण्याबाबत आपण राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांना पत्र पाठवत असल्याचं आश्वासन दिले. सर्व प्रार्थनास्थळे करोनासंबंधी सुरक्षेचे नियम पाळून सुरू करावीत अशी मागणी रामदास आठवले यांनी केली आहे