चीनला धडा शिकवण्यासाठी एकदा चीनशी आरपारचे युद्ध लढले पाहिजे तसंच चीनची आर्थिक कोंडी करण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत असं मत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केलं आहे. याआधी रामदास आठवले यांनी चीनच्या सर्व प्रकारच्या वस्तू व खाद्यपदार्थावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. “चीन हा धोकेबाज देश आहे. धोका देऊन त्यांनी लडाखच्या गलवानमध्ये भारतीय सैन्यांवर हल्ला केला. या भ्याड हल्ल्याचा आपण तीव्र निषेध करतो. चीनला धडा शिकवण्यासाठी एकदा चीनशी आरपारचे युद्ध लढले पाहिजे तसंच चीनची आर्थिक कोंडी करण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. त्यासाठी भारतीयांनी चिनी मालावर बहिष्कार टाकला पाहिजे. व्यापार, उद्योग जगातला माझे नम्र निवेदन आहे की चीनमधून कोणत्याही प्रकारच्या सामुग्रीची आयात करू नका. चीन मधून मालाच्या आयातीवर बंदी आणावी,” असं आवाहन रामदास आठवले यांनी केलं आहे. चायना धोकेबाज देश है. चायना को सबक सिखाने के लिये एकदिन आरपार की लढाई चायना के साथ लढणी चाहीये! pic.twitter.com/zlsyF10Xfp — Dr.Ramdas Athawale (@RamdasAthawale) June 18, 2020 “लडाखच्या गलवान भागात भारतीय सैन्यावर चिनी सैन्याने कपटबुद्धीने नियोजन करून धोका देत क्रूर हल्ला केला. हा हल्ला भ्याड हल्ला होता. चिनी हल्ला भारतीय सैनिकांनी परतवून लावता आपले शौर्य सिद्ध केले. या हल्ल्यात २० भारतीय जवान शहीद झाले. त्यांचे हौतात्म्य वाया जाणार नसल्याचे पंतप्रधानांनी म्हंटले आहे. आम्हाला युद्ध नको बुद्ध हवा आहे. पण चीन धोका देत राहून युद्धाची खुमखुमी दाखवीत असेल तर एक दिवस आरपारचे युद्ध लढून चीनला कायमचा धडा शिकविण्यासाठी भारतीय सैन्य समर्थ आहे,” असंही रामदास आठवले यांनी सांगितलं आहे.