भीमा कोरेगाव येथील हिंसाचाराच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षांकडून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपाला लक्ष्य करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख डॉ. मनमोहन वैद्य यांनी एका निवेदनाद्वारे संघटनेची भूमिका मांडली. समाजात काही घटक जाणीवपूर्वक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा शक्तींना बळी पडू नका, शांतता राखा, असे आवाहन त्यांनी केले. भीमा कोरेगावाचा हिंसाचार आणि त्यानंतर मुंबई, पुण्यासह त्याचे राज्यभरात उमटलेले पडसाद ही खूप दु:खद बाब आहे. भीमा कोरेगावमध्ये जो काही प्रकार घडला तो निंदाजनक असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ याचा तीव्र निषेध करत असल्याचे वैद्य यांनी सांगितले. जे यात दोषी आढळतील त्यांना कायद्यानुसार शिक्षा झाली पाहिजे. काही घटक समाजात जाणीवपूर्वक द्वेष आणि वैरभाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. लोकांनी अशा शक्तींच्या सुप्त हेतूंना बळी पडू नये, असे आवाहनही त्यांनी केले.

रस्तोरस्ती अस्वस्थता..

भीमा कोरेगाव घटनेच्या पार्श्वभूमीवर मंगवारपासून विरोधी पक्षांकडून संघ आणि भाजपाला लक्ष्य केले जात आहे. उजव्या विचारसरणीच्या संघटनांनी कोरेगाव येथील ‘विजय दिवस’ देशविरोधी ठरवत त्याबद्दल आक्षेप घेतला होता. या पार्श्वभूमीवर संघ आणि भाजपानेच या हिंसाचाराला खतपाणी घातल्याचा आरोप काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांकडून केला जात आहे.

पुन्हा मुख्यमंत्रीच लक्ष्य; भाजपची कोंडी

दरम्यान, आज या घटनेच्या निषेधार्थ राज्यातील दलित संघटनांकडून महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला आहे. मुंबई आणि पुण्यात मंगळवारीही या घटनेचे पडसाद उमटले होते. सोमवारी रात्रीपासूनच शहरातील आंबेडकरी वस्त्या अस्वस्थ होत्या. मंगळवारी सकाळी वस्त्यांमधून आंबेडकरी जनता रस्त्यावर उतरली. पूर्व द्रुतगती मार्गासह ठिकठिकाणी रास्ता रोको, गोवंडी-चेंबूर येथे रेल रोको घडल्याने मुंबईची वाहतूक व्यवस्था कोलमडली. आंबेडकरी जनतेचा प्रभाव असलेल्या घाटकोपर, विक्रोळी, मुलुंड, भांडुप, वरळीसह अन्य उपनगरांमधील दुकाने, व्यवहार, व्यवसाय बंद पाडण्यात आला. अनेक ठिकाणी बेस्ट बसेसची तोडफोड करण्यात आली.