राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते आणि पत्रकार मा. गो. वैद्य यांचं निधन झालं आहे. वयाच्या ९७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी याबद्दल ट्विट करुन माहिती दिली आहे. मा. गो. वैद्य यांच्या पश्चात त्यांची पत्नी सुनंदा, तीन मुली, पाच मुलं असं कुटुंब आहे. मा.गो. वैद्य यांची अंत्ययात्रा रविवार २० डिसेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता निघणार आहे. अंबाझरी घाट या ठिकाणी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

१९६६ पासून मा. गो. वैद्य यांनी पत्रकारिता सुरु केली होती. अनेक उत्कृष्ट लेख, अग्रलेख, विविध विषयांवर भाष्य लिहणाऱ्या वैद्य यांना पत्रकारिता आणि समाजसेवेचे अनेक पुरस्कार मिळाले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची माहिती देणारं सुगम संघ नावाचं हिंदी पुस्तकही त्यांनी लिहिलं होतं.

मा. गो. वैद्य यांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विटरवर श्रद्धांजली अर्पण केली. “राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जेष्ठ स्वयंसेवक, जेष्ठ संपादक आणि विचारवंत मा. गो. उपाख्य बाबूराव वैद्य यांना माझी विनम्र श्रद्धांजली. पूज्य गुरुजी यांच्यासह सर्व सरसंघचालकांसोबत काम करण्याचे, त्यांना जवळून अनुभवण्याचे भाग्य बाबुरावांना लाभले होते.” असं म्हणत नितीन गडकरींनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.