RSS Vijaya Dashami Utsav 2018: याचक किंवा आलोचक होऊन आपण देशसेवा करु शकत नाही. संवेदनशील, सर्वसमावेशक, स्वावलंबी आणि सुरक्षित भारत निर्माण करण्याचा संकल्प आपण केला पाहिजे, असे मत नोबेल पारितोषिक विजेते कैलाश सत्यर्थी यांनी व्यक्त केले. आपण आणखी किती दिवस उदासीनता, तटस्थता आणि भीतीच्या सावटाखाली वावरणार आहोत, असा सवाल त्यांनी विचारला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी देशाच्या वर्तमान आणि भविष्याच्या रक्षणासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

नागपूरमधील रेशीमबाग मैदानावरील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवात नोबेल पारितोषिक विजेते कैलाश सत्यर्थी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमात कैलाश सत्यर्थी म्हणाले, मला या कार्यक्रमात आमंत्रित करुन संघाने फक्त भारतातीलच नव्हे तर जगभरातील कोट्यवधी शोषित आणि दुर्लक्षित लहान मुलांच्या दिशेने सन्मान आणि प्रेमाचा हात पुढे केला आहे. मी त्या सर्वांच्या वतीने संघाचा आभारी आहे.

सशक्त राष्ट्र हे फक्त सरकारवर आरोप करुन किंवा त्यांच्यावर खापर फोडून तयार होऊ शकत नाही. जेव्हा समाज मोठी स्वप्नं बघणार आणि देशाला सर्वच क्षेत्रात पुढे नेण्याचा संकल्प करणार त्यावेळीच हा देश सक्षम होईल, असे त्यांनी सांगितले. गेल्या २० वर्षांमध्ये जगात बालकामगारांचे प्रमाण २६ कोटींवरुन १५ कोटींवर आले आहे. मात्र, दुर्दैवाने भारतात अजूनही मुलींची जनावरांसारखी खरेदी विक्री होते, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. किती दिवस आपण दुसऱ्यांच्या मागे धावणार. आपण सांस्कृतिक क्षमता ओळखून काम केले पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले.