राज्याच्या राजकीय वर्तुळात अंबानी स्फोटकं, मनसुख हिरेन मृत्यू आणि सचिन वाझे प्रकरणाचे पडसाद उमटत आहेत. वाझे प्रकरणावरून भाजपाकडून होत असलेल्या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसने प्रत्युत्तर देताना फडणवीसांनी अधिकारी नेमून मंत्र्यांवर पाळत ठेवल्याचा आरोप केला होता. या आरोपावरून भाजपाने पुन्हा राष्ट्रवादीवर पलटवार केला आहे.

“देवेंद्र फडणवीस यांनी माहिती महासंचालकपदावर पोलीस खात्यातील, त्यातही सायबर गुन्हे शाखेच्या ब्रिजेश सिंह यांना आणून आपल्याच सरकारमधील मंत्र्यांवर पाळत ठेवण्याचे उद्योग केले होते. तेच आता पोलीस अधिकाऱ्यांच्या गैरवापरावर प्रवचने झोडत आहेत,” अशी टीका राष्ट्रवादीने केली होती.

आणखी वाचा- अंबानी प्रकरणात गृहमंत्रीपद जाणार?: शरद पवार भेटीनंतर अनिल देशमुखांनी दिली प्रतिक्रिया

राष्ट्रवादी काँग्रेसच्या टीकेला भाजपाचे आमदार राम कदम यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप म्हणजे ‘शिळ्या कढीला ऊत’ आहे. एखादा अधिकारी आमच्या काळात नियुक्त झाला म्हणजे तो पाळत ठेवणारा आणि मग तुमच्या काळात काय दहशतवादी कृत्य करायला, खंडण्या वसूल करायला अधिकारी नियुक्त केले का?,” असा सवाल राम कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला केला आहे.

आणखी वाचा- वाझे प्रकरण सत्ताधाऱ्यांचं हप्ता वसुली कांड; संजय निरुपम यांचा गंभीर आरोप 

भाजपाकडून देशमुखांच्या राजीनाम्याची मागणी

सचिन वाझे प्रकरण चर्चेत आल्यानंतर राज्य सरकारकडून मुंबईच्या पोलीस आयुक्तांची बदली करण्यात आली. परमबीर सिंह यांची बदली करण्यात आल्यानंतर भाजपाकडून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. मात्र, यावर राष्ट्रवादीने आधीच भूमिका स्पष्ट केली असून, गृहमंत्रीपद देशमुखांकडेच राहणार असल्याचं म्हटलं आहे.