रयत क्रांती संघटना शेतकऱ्यांसाठी व्यासपीठ

रयत क्रांती संघटना राजकीय पक्ष नसून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी स्थापन केलेले व्यासपीठ असून आपण भाजपाचे क्रियाशील सदस्य असल्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

राज्यमंत्री खोत म्हणाले की, विधान परिषदेवर निवड होण्यापूर्वी मी भाजपाचा क्रियाशील सदस्य झालो असून यानंतरच निवडीवेळी एबी फॉर्म मला पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे. यामुळे मी भाजपाचा सक्रिय सदस्य असल्याने पुन्हा भाजपामध्ये प्रवेश घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

आगामी निवडणुकीमध्ये भाजपाचा एक सदस्य या नात्याने या पक्षाचा प्रचार करणे आणि पक्षाचे उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणे हे माझे कर्तव्यच ठरत आहे. दसऱ्यावेळी रयत क्रांती संघटनेची स्थापना करण्यात आली, ती केवळ शेतकरी प्रश्नांना व्यासपीठ उपलब्ध व्हावे यासाठीच.

राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचा चष्माच हिरवा असल्याने त्यांना सर्व हिरवेच दिसते आहे. आम्ही आजवर कोणती बँक लुटली नाही, एकाच जागेवर दोन-दोन संस्था उभारून अनुदान लाटले नसल्याने त्यांनी केलेल्या आरोपांची फिकीर नाही. मोठं बोल, खोटं बोल अन् तेही रेटून बोल ही धनंजय मुंडे यांची वृत्ती आहे.

खोत म्हणाले की, कृषी अनुदानाचा नातेवाईकांनाच लाभ देण्यात आल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला. यावर सभागृहातच मी सविस्तर उत्तर दिले. तरीही ते माझ्यावर आरोप करत आहेत. मोठे बोल, खोटे बोल अन् तेही रेटून बोल ही मुंडे यांची वृत्ती आहे. मुंडेंनी अगोदर आपल्या भोवतीचा जाळ बघावा. आम्ही कोणतीही बँक लुटली नाही. दारूगोळा भरून आम्हीही तयार आहोत. आम्ही आजवर एका जागेवर दोन-दोन सूतगिरण्या दाखवून कोणतेही अनुदान लाटले नाही. गोरगरीब जनतेच्या नावाने मागासवर्गीय सूतगिरण्या उभारून त्या लुटल्या नाहीत. त्यामुळे सौ चूहे खाके बिल्ली चली हजको’ ही राष्ट्रवादीची प्रवृत्ती आहे.

इस्लामपूरच्या सभेत मला काहींनी फुटाणा, तर काहींनी दीडआणा म्हटले, पण आम्ही केव्हा तरी प्रवासातच फुटाणे खात असतो. मात्र, जे रात्रीचे फुटाणेच घेतात, त्यांना फुटाणेच आठवणार. फुटाणे खाल्ल्यानंतर त्यांना आपण राजा बनल्याचा भास होतो. जे स्वतच काचेच्या घरात राहतात, त्यांनी दुसऱ्यावर आरोप करताना थोडा विचार करावा. फुटाण्याचा आरोप करणारा नेता जयंतरावांच्या गटाचा सोंगाडय़ा आहे, असा टोला सदाभाऊ खोत यांनी दिलीपतात्या पाटील यांचे नाव न घेता लगावला.