साध्वी प्रज्ञा मूर्ख आहेत. आमचं दुर्दैव की त्या आमच्या पक्षात आहेत असं वक्तव्य भाजपाचे प्रवक्ते मधू चव्हाण यांनी केलं आहे. एका मराठी वृत्तवाहिनीवरील चर्चेच्या कार्यक्रमात मधू चव्हाण यांना नथुराम गोडसेबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्याबाबत बोलत असताना मधू चव्हाण यांनी साध्वी प्रज्ञा यांना मूर्ख म्हटलं आहे.

पुण्यातल्या CAA विरोधातल्या सभेत उर्मिला मातोंडकर यांनी महात्मा गांधी यांचा मारेकरी हिंदूच होता असं वक्तव्य केलं होतं. त्याबाबत मधू चव्हाण यांना प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा ते जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे. गुन्हा करणाऱ्याला धर्म नसतो असं म्हणाले. त्यावेळी त्यांना साध्वी प्रज्ञा नथुरामला देशभक्त म्हणतात त्याचं काय असा प्रतिप्रश्न करण्यात आला. ज्यानंतर मधू चव्हाण म्हणाले, “त्या साध्वी मूर्ख आहेत, त्या आमच्या पक्षात आहेत हे आमचं दुर्दैव”

३० जानेवारीला पुण्यात झालेल्या सभेत उर्मिला मातोंडकर यांनी CAA ची तुलना रॉलेट कायद्याशी केली होती. या कायद्याशी तुलना करणं योग्य आहे का या विषयावर चर्चा आयोजित करण्यात आली होती. या चर्चेत मधू चव्हाण यांनीही सहभाग घेतला होता. त्यांना जेव्हा याबाबत प्रश्न विचारण्यात आला आणि नथुराम बाबत प्रश्न विचारण्यात आला तेव्हा ते म्हणाले की ” गोडसे खुनी होता त्याने गांधींचा खून केला हेच खरं आहे. तो हिंदू होता की मुसलमान याचा विचार करणं चुकीचं आहे. CAA हा मुसलमान विरोधी कायदा नाही” असंही चव्हाण म्हणाले. त्याचवेळी नथुरामच्या संदर्भावरुन त्यांना साध्वी प्रज्ञा यांच्याबाबतचा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा मधू चव्हाण म्हणाले की साध्वी प्रज्ञा मूर्ख आहेत. त्या आमच्या पक्षात आहेत हे आमचं दुर्दैव. आता मधू चव्हाण यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे भाजपातून त्यांच्यावर कारवाईही होऊ शकते. पुढे काय होणार हे वक्तव्य त्यांना भोवणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.