शेकडो गुंतवणुकदारांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणाऱ्या बदलापूरमधील सागर इन्वेस्टमेंटचा संचालक आणि ४०० कोटींच्या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार श्रीराम समुद्र याला १३ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. मुंबई हायकोर्टाने श्रीराम समुद्रचा जामीनअर्ज फेटाळून लावल्यामुळे, बुधवारी रात्री सुमद्रने ठाणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात शरणागती पत्करली. यानंतर श्रीराम समुद्रला पोलिसांनी कल्याणच्या सत्र न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने १३ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. यावेळी अनेक गुंतवणुकदारांनी कोर्टाच्या परिसरात गर्दी केली होती. गेल्या ३० वर्षांपासून बदलापूर आणि राज्यातील विविध शहरांत गुंतवणुकीचा व्यवसाय करणाऱ्या सागर इन्वेस्टमेंट कंपनीत हजारो गुंतवणूकदारांनी जवळपास ४०० कोटी रूपये गुंतवले होते. मात्र कंपनीला २०१६ च्या सुमारास घरघर लागली आणि सागर इन्वेस्टमेंटचा डोलारा कोसळला. जानेवारी २०१७ नंतर गुंतवणूकदारांचे व्याज मिळणे बंद झाले. कंपनी बुडाल्याची चाहूल गुंतवणूकदारांना लागली होती. मात्र, मार्चमध्ये कंपनीचे संस्थापक सुहास आणि सुनिता समुद्र, संचालक श्रीराम समुद्र आणि अन्य साथीदार पसार झाले आणि गुंतवणूकदारांना धक्का बसला. सुहास आणि सुनिता समुद्र यांनी शरणागती पत्कारली असली तरी प्रकृतीच्या कारणांमुळे त्यांना जामीन मिळाला होता. तर श्रीराम आणि अन्य आरोपींना अंतरिम जामीन मिळाला होता. २४ फेब्रुवारी रोजी हायकोर्टाने श्रीराम समुद्र आणि अन्य आरोपींचा जामिन अर्ज फेटाळल्याने श्रीरामला अटक होणार हे स्पष्ट झाले होते. हायकोर्टाने त्याला ८ मार्चपर्यंत न्यायालयात हजर होण्याचे आदेश दिले होते. दुसरीकडे पोलिसांचे पथकही त्याचा शोध घेत होते. अखेर बुधवारी संध्याकाळी तो आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात हजर झाला. त्याच्यासोबत आणखी तीन आरोपीही शरण आल्याची माहिती पोलिसांनी दिली. श्रीराम समुद्रला अटक झाल्याने गुंतवणूकदारांना काही अंशी दिलासा मिळाला आहे. पैसे परत मिळणार का? बदलापूरमध्ये गुंतवणूकीचा व्यवसाय करणाऱ्या सुहास समुद्र यांनी सागर इन्वेस्टमेंटच्या माध्यमातून विविध गुंतवणूकीच्या योजना सुरु करुन गुंतवणूकदार मिळवले होते. परताव्याची रक्कम चांगली असल्याने अनेक जण त्यांच्या जाळ्यात अडकत गेले. हजार रुपयांपासून लाखो रूपयांपर्यंत या योजनेत गुंतवण्यात आले. यात ज्येष्ठ नागरिक आणि पेंशनधारकांचा समावेश आहे. अनेकांनी आपल्या आयुष्याची पुंजी यात गुंतवली होती. त्यामुळे अटकेनंतर आता तरी पैसे परत मिळतील का असा प्रश्न फसवणूक झालेले गुंतवणूकदार विचारत आहेत.