केंद्र सरकारच्या सागरमाला योजने अंतर्गत कोकणातील ९ मासेमारी बंदरांचा विकास केला जाणार आहे. यात रायगड जिल्ह्यतील मुरुड मधील आगरदंडा, श्रीवर्धन तालुक्यातील जीवना तर रत्नागिरी जिल्ह्यतील हर्णे बंदराचा समावेश आहे. महत्वाची बाब म्हणजे यासाठी तब्बल ५५८ कोटी रुपयांचा केंद्राकडे सादर करण्यात आला आहे. नैसर्गिक सौंदर्य लाभलेल्या या बंदरांमध्ये मासे उतरवण्याच्या सुविधांसह पर्यटकांना उपयुक्ती अशा सोयी सुविधा उभारण्यात येणार आहेत. याचा उपयोग मासेमारी उद्योगाबरोबरच पर्यटन उद्योगालाही होणार आहे. आतापर्यंत विकासापासून दूर राहिलेल्या या बंदर परिसरातील नागरिकांच्या सर्वागिण विकासासाठी ही योजना राबवण्यात येत असल्याचे खासदार सुनील तटकरे यांनी सांगितले. केंद्रीय नौवहन राज्यमंत्री मनसुख मांडविया यांनी या संदर्भात सकारात्मकता दर्शवली असल्याचे सुनील तटकरे यांनी म्हटले आहे. काही दिवसांपुर्वीच सुनील तटकरे यांनी खा. सुप्रिया सुळे यांच्या समवेत केंद्रीय नौवहन राज्यमंत्री मनसुख मांडविया यांची भेट घेतली घेतली होती. मासळी उतरवण्यासाठी आवश्यक असलेल्या जेट्टीसह कोल्ड स्टोरेज, मरिना, आर्ट गॅलरी, स्वच्छतागृह, उपहारगृह उभारण्यात याव्यात, असा हा प्रस्ताव आहे. तिनही बंदरांसाठी ५५८ कोटी रुपये खर्च अपेक्षीत आहे. केंद्राच्या सागरमाला प्रकल्पातंर्गत ९ मासेमारी बंदरे आणि १६ मासे उतरविण्याची ठिकाणे विकसीत केली जात आहेत. या ९ मासेमारी बंदरातील आगरदांडा, जीवना कोळीवाडा आणि हर्णे बंदराचा विकास पर्यटनवाढीसाठी करण्यात यावा, अशी मागणीचा प्रस्ताव तटकरे यांनी केंद्राकडे पाठवला आहे. लहान बंदरांच्या विकासासाठी साडेसहाशे कोटी या तीन बंदरांबरोबरच कोकण किनारपट्टीवर २० मासळी उतरविण्याची ठिकाणे आणि लहान ४ बंदरांच्या विकासासाठी विकास आराखडा तयार करण्यात आलेला आहे. समुद्रालगत असणारी ही लहान बंदरे विकसीत झाल्यास वाहतुकीबरोबरच पर्यटकांची रहदारी वाढणार आहे. या बंदरांचा सर्वेक्षण बंगलोर येथील सीआयसीईएफ या संस्थेने पुर्ण केला असून आहवाल केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला आहे. यासाठी अंदाजीत ६५० कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार करण्यात आल्याचीही माहिती सुमंत भांगे यांनी दिली. अग्रक्रमाने या तीनही बंदरांचे डीपीआर, बंदरांचे सर्वेक्षण, उपलब्ध साधनसाधने यांचा अहवाल तयार करुन राज्यशासनाने केंद्र शासनाकडे पाठविलेले आहे. केंद्राची मंजुरी आल्यानंतर या बंदरांचा विकास सागरमाला, पंतप्रधान मस्त्य संपदा योजना किंवा अन्य कोणत्या योजनेतून राबवयाचे हे ठरणार आहे. - सुमंत भागे, व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य मत्स्य उद्योग महामंडळ, मुंबई या तीन बंदरांच्या परिसरात पर्यटनवाढीसाठी खूप पोषक वातावरण आहे. मासेमारी उद्योगाबरोबरच पर्यटन उद्योगाला बळकटी आणण्यासाठी या बंदरांचा विकास करणे आवश्यक आहे. यामधून येथील येथील तरुणांना रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध होणार आहेत. - खा. सुनील तटकरे रायगड लोकसभा मतदार संघ