माझ्या शेतातील आंबा खाल्ला तर जोडप्यांना अपत्यप्राप्ती होते असं अजब वक्तव्य श्री शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक मनोहर उर्फ संभाजी भिडे यांनी केलं आहे. आपल्या शेतातील आंबे खाल्ल्याने जवळपास 150 जोडप्यांना अपत्यप्राप्ती झाल्याचा दावाही त्यांनी केला आहे. नाशिकमधील एका सभेत ते बोलत होते.

“लग्न होऊन १५ वर्ष झालेल्यांनाही मुलं होतं नाहीत. अशा स्त्री, पुरुषांनी ही फळं खाल्ल्यास त्यांना निश्चित मुलं होतील. मी आतापर्यंत १८० हून जास्त जणांना, जोडप्यांना हे फळ खायला दिलं असून १५० पेक्षा जास्त जणांना मुलं झाली आहेत”, असं विधान संभाजी भिडे यांनी केलं आहे. विशेष म्हणजे ज्यांना मुलगा हवा असेल, त्यांना मुलगाच होईल असाही दावा त्यांनी केला आहे.

ही गोष्ट आपण फक्त आपल्या आईला सांगितली असून आता तुम्हाला सांगत आहोत असं त्यांनी यावेळी सांगितलं. संभाजी भिडे यांच्या वक्तव्यावर टीका होण्यास सुरुवात झाली असून अंधश्रद्धेला खतपाणी घातलं जात असल्याचं अनेकांनी म्हटलं आहे.