श्रीरामपूर : शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांची सभा उधळून लावण्याचे दलित संघटनांनी जाहीर केल्यामुळे प्रचंड पोलीस बंदोबस्तात सभा पार पडली.  सभेला मोठा प्रतिसाद मिळाला. सत्ता मिळविण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल प्रेम व आदर दाखविला जातो. मात्र त्यांचा भगवा झेंडा व भगवा विचार टिकविण्यासाठी हे लोक पुढे येत नाहीत, अशी खंत भिडे यांनी या वेळी व्यक्त केली.

शहरातील उत्सव मंगल कार्यालयात संभाजी भिडे यांची सभा पोलिस बंदोबस्तात पार पडली. सभेस मोठा प्रतिसाद मिळाला. दलित संघटनांनी भिडे यांची सभा उधळून लावण्याची घोषणा केली होती. पोलिसांनी रिपब्लिकन पक्षाचे भीमराज बागुल, रितेश एडके, मोहन आव्हाड, विशाल सुरडकर, किरण साळवी, सचिन ब्राह्मणे, भगवान रोकडे आदिंसह सोळा कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊ न नंतर सोडून दिले. सभेकडे जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर पोलिसांनी तपासणी नाके उभारले होते. शहरात बंदोबस्त मोठय़ा प्रमाणावर ठेवण्यात आला होता. पोलिसांमुळे कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही.

भिडे म्हणाले,की  पंडित  नेहरूंनी यशवंतराव चव्हाण या मराठी माणसाला संरक्षण मंत्री केले होते. पूर्वी त्यागी लोक होते. आता तसे नाही. चव्हाणांनी फक्त राजकारण केले नाही. त्यांनी लिहिलेले ‘सह्यद्रीचे वारे’ पुस्तक वाचा, असा सल्ला तरूणांनी दिला. माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय आर.आर. पाटील एकदा म्हणाले होते, आज हिंदुस्थान एकत्र आहे त्याचे कारण भारतीय सैन्य होय. ते काही वावगे ठरणार नाही. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा धागा आज हिंदूना एकरुप करणारा धागा आहे.  छत्रपतींनी २८९ मृत्यूला झुंज देणाऱ्या लढाया केल्या. छत्रपतींचं शरीर लहान होत, मात्र त्यांचे कार्य थोर होते.  राजगड ते रायगड मोहिमेत सहभागी व्हा. शिवरायांचे पुजारी व्हा, असे आवाहन भिडे यांनी तरुणांना केले.

साखर कारखानदारांवर  टीका

आज आपल्याला छत्रपती हवे, मात्र भगवा झेंडा नको. आज सर्व साखर कारखान्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक  आहे. मात्र त्यांचे विचार तेथे दिसत नाहीत. नवरा नको पोटगी पाहीजे, अशी आज हिंदूंची मानसिकता झाली आहे.