माझ्या शेतातला आंबा खाल्ला तर अपत्यप्राप्ती होते असे वक्तव्य श्री शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक मनोहर उर्फ संभाजी भिडे यांनी केलं आहे. या वक्तव्यावर आता सोशल मीडियावरही टीका होऊ लागली आहे. तर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला आहे. एकीकडे तंत्रज्ञानाचा विकास होताना आपल्याला दिसतो आहे आणि दुसरीकडे संभाजी भिडेंसारखी माणसे आंबा खाल्ला तर अपत्यप्राप्ती होते असे म्हणतात. त्यांचे हे वक्तव्य दुर्दैवी आहे, महिलांचा हा अपमान आहे अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली आहे. माता होणे याचा प्रत्येक स्त्रीला अभिमान असतो. मलाही तो आहे, मात्र संभाजी भिडेंच्या वक्तव्यामुळे महिला वर्गाचा अपमानच त्यांनी केला आहे असे त्यांनी म्हटले आहे.

पाहा व्हिडिओ

[jwplayer JoU3bGOC]

देशात आणि राज्यात जे सरकार आहे त्यांना आणि त्यांच्या जवळच्या लोकांना विज्ञानावरच विश्वास नाही. देशाचे शिक्षण मंत्रीच म्हटले होते की डार्विनचा सिद्धांत खोटा आहे. अशा प्रकारची वक्तव्ये ऐकायला मिळत आहेत. ही बाब खरोखर दुर्दैवी आहे या वक्तव्यांचा मी एक महिला म्हणून निषेध करते असेही सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले. ज्या महाराष्ट्रात सावित्रीबाई फुलेंचा जन्म झाला त्याच महाराष्ट्रात आज महिलांचा अशा वक्तव्यांमधून अपमान केला जातोय. महिलांना समान अधिकार देण्याचे धोरण सर्वात आधी महाराष्ट्रात आले अशा महाराष्ट्रात महिलांचा या प्रकारे अपमान होणे अत्यंत खेदजनक आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.

संभाजी भिडे यांनी नेमके काय म्हटले आहे?

माझ्या शेतातील आंबा खाल्ला तर जोडप्यांना अपत्यप्राप्ती होते असं अजब वक्तव्य श्री शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक मनोहर उर्फ संभाजी भिडे यांनी केलं आहे. आपल्या शेतातील आंबे खाल्ल्याने जवळपास 150 जोडप्यांना अपत्यप्राप्ती झाल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

भाजप च्या मंत्री पंकजा मुंडे या काल पुण्यातील कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हल्ला बोल आंदोलन नसून डल्ला मारो असे विधान केले आहे.या प्रश्नावर त्या म्हणाल्या की,लोकशाहीमध्ये प्रत्येकाला बोलण्याचा अधिकारी असून या पुढील काळात देखील राज्यातील अनेक भागात हल्ला बोल आंदोलन काढण्यात येणार आहे.असे सांगत भाजप ला या हल्ला बोल चा त्रास होत असल्याने अशा प्रकारचे विधान केले गेले आहे.अशा शब्दात सुप्रिया सुळे यांनी पंकजा मुंडे च्या विधानाचा खरपूस समाचार घेतला