साहित्य संमेलनाच्या निवडणुकीत संस्कृतीची वजाबाकी करणारे अनेकजण आहेत. आपण मात्र संस्कृतीची जोडणी करण्यासाठी संमेलनाध्यक्ष निवडणुकीच्या िरगणात उभे असल्याचे प्रतिपादन डॉ. श्रीपाद सबनीस यांनी केले.
पंजाबातील घुमान येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचे डॉ. सबनीस उमेदवार आहेत. मूळचे लातूर जिल्हय़ातील रहिवाशी असलेल्या डॉ. सबनीस यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. डॉ. शेषेराव मोहिते, डॉ. भास्कर बडे, प्रा. फ. म. शहाजिंदे, भारत सातपुते आदी या पत्रकार बैठकीस उपस्थित होते.
डॉ. सबनीस म्हणाले की, गेल्या ४० वर्षांपासून साहित्य क्षेत्रात आपण आहोत. साहित्यातील जवळपास सर्वच विषय आपण हाताळले आहेत. सुमारे ४०० समीक्षात्मक लेख प्रसिद्ध असून, २६ ग्रंथही प्रकाशित झाले आहेत. आतापर्यंत २ हजार ठिकाणी व्याख्यानेही झाली आहेत. राज्याच्या सर्व क्षेत्रातील नामवंत साहित्यिकांनी साहित्य क्षेत्रातील आपण मांडलेल्या भूमिकेचे कौतुक केले. धर्मनिरपेक्षतेची नाळ आपण सोडली नाही. या बरोबरच दलित, मुस्लीम, ख्रिश्चन अशा सर्वच साहित्य प्रवाहाशी नातेही कायम ठेवले.
सांस्कृतिक क्षेत्रात लोकशाही रुजते आहे. त्यासाठी साहित्य संमेलनाचा चांगलाच उपयोग होत आहे. साहित्य क्षेत्रात निरनिराळे संमेलन होत असले, तरी ती साहित्य क्षेत्राशी पूजाच मांडण्याची आपली भूमिका आहे. साहित्य संमेलनाध्यक्ष निवडणुकीत सध्या घडणारे प्रकार मात्र आपल्या संस्कृतीला शोभणारे नसल्याचेही त्यांनी मान्य केले. निवडणुकीला उभे राहणाऱ्या सर्व उमेदवारांचा आपण सन्मान करतो. ते प्रतिस्पर्धी असतील. मात्र, शत्रू नाहीत, ही आपली भूमिका आहे. मी पराभूत झालो तरी माझी भूमिका पराभूत होत नाही, यावर आपण ठाम असल्याचेही त्यांनी सांगितले.