मुंबई ते नागपूरदरम्यानचा प्रस्तावित समृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव द्या अशी मागणी शिवसेना आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. समृद्धी महामार्गाला विरोध दर्शवणाऱ्या शिवसेनेच्या आमदारांच्या या मागणीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधान आले आहे. शिवसेना आमदारांच्या एका शिष्टमंडळाने पत्र लिहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ही मागणी केली आहे. १० जिल्हे, ३० तालुके आणि ३५६ गावातून हा महामार्ग जाणार आहे. नागपूर, वर्धा, अमरावती, वाशीम, बुलडाणा, जालना, औरंगाबाद, अहमदनगर, नाशिक आणि ठाणे जिल्ह्यातून हा महामार्ग जाणार आहे. आता मुंबईहून नागपूरला पोचायला सरासरी १६ तास लागतात. या महामार्गामुळे तो कालावधी निम्म्यावर येणं अपेक्षित मानलं जातंय.