मुबंई-नागरपूर समृद्धी महामार्गासाठी लागणाऱ्या जमीनीचे भूसंपादन जवळपास पुर्ण झाले आहे. लवकरच महामार्गाचे भूमी पूजन होऊन कामाला सुरवात होणार आहे. महामार्ग उभारण्यासाठी लागणारे गौण खनिज मुरूम, दगड, माती सहज उपलब्ध व्हावी तसेच शेतकNयांनाही याचा फायदा मिळावा, यासाठी ठेकेदार शेतकऱ्यांना मोफत शेततळे तयार करून देणार आणि यातून मिळणारे गौण खनिज महामार्गाच्या कामासाठी वापरणार आहे. यामुळे दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना मोठ्या फायदा होणार आहे. राज्य शासनाने यासाठी नुकतेच परिपत्रक काढले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्वकांक्षी प्रकल्प समजला जाणारा समृद्धी महामार्गाच्या भूसंपादनाचे काम जवळपास ९० टक्के पुर्ण झाले आहे. मात्र सरकारला यासाठी शेतकऱ्यांचा मोठा रोष पतकारावा लागला होता. अद्यापही १० टक्के शेतकरी आपली जमीन देण्यास तयार नसल्याचे दिसून येत आहे. असे असले तरी राज्य शासन लवकरच समद्धी महामार्गाचे कामाला सुरवात करणार आहे. महामार्ग उभारण्यासाठी लागणारे गौण खनिज कंत्राटदाराला सहज उपलब्ध व्हावे, यासाठी राज्य शासनाने एक युक्ती लढवली आहे. समृद्धी महामार्ग ज्या भागातून जाणार आहे, त्या बाजूला असणाऱ्या शेतकऱ्यांना पाहिजेत त्या प्रमाणात कंत्राटदार शेततळे तयार करून देईल, आणि यातून मिळणारे मुरूम, दगळ, माती तो महामार्गाच्या कामासाठी वापरणार. यामुळे दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार असून कंत्राटदाराला सहज गौण खनिज उपलब्ध होईल. यासाठी कंत्राटदाराला काही अटी घालण्यात आल्या आहे.

शेतकऱ्याची फसवणूक होऊ नये किंवा दोघांमध्ये कोणताही वाद होऊ नये यासाठी शेतकरी, ठेकेदार यांच्यात एक करार करण्यात येईल, यात मध्यस्ती म्हणून कृषी विभागाचे अधिकारी असणार आहे. कंत्राटदाराला मिळणारे गौण खनिजे महामार्ग विकास प्रकल्पांवरच वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच त्यांना या गौण खनिजांची विक्री करता येणार नाही. खोदकामाच्या ठिकाणापासून प्रकल्प स्थळापर्यंत रस्ता उपलब्ध नसल्यास असा पोहोच रस्ता संबंधित कंत्राटदाराला तयार करावा लागणार आहे. राज्य शासनाला समृद्धी महामार्गामुळे शेतकऱ्यांच रोषाला समोर जावे लागले होते. मात्र यामुळे शेतकऱ्यांचा रोष काही प्रमाणात कमी होण्याचे चित्र दिसत आहे.