आंध्रप्रदेश, तेलंगणा व नागपूरच्या तस्करांचा डल्ला

चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्य़ातील गोदावरी, इंद्रावती व वैनगंगा या तीन नद्यांवर आंध्रप्रदेश, तेलंगणा व नागपूरचे रेती तस्कर मध्यरात्रीच्या सुमारास  कोटय़वधींची रेतीचोरी करीत आहेत. ब्रम्हपुरी येथे पाच जणांना अटक करतांना २३ लाखाची रेती जप्त केली, तर सिरोंचा रेती घाटावर एका दिवसाला २०० ते २५० ट्रक रेती लगतच्या आंध्र व तेलंगणात नेली जाते. रेती तस्करीचे आंतरराज्यीय रॅकेट येथे सक्रीय झाले आहे.

राज्याचे सर्वात शेवटचे टोक असलेल्या सिरोंचा तालुक्यातून गोदावरी व इंद्रावती या राज्यातील मोठय़ा नद्या वाहतात. सध्या तेलंगणा व आंध्रप्रदेशात रेतीचा मोठा तुटवडा आहे. त्यामुळे तेथील रेती तस्करांनी अक्षरश: महाराष्ट्रातील गोदावरी व इंद्रावती या नद्यांच्या रेतीघाटावर आक्रमण करून अवैध रेती उपसा सुरू केला आहे. यंत्राव्दारे रात्री नदीघाटातील रेतीचा उपसा व वाहतूक करण्यात येऊ नये, असे लिलाव प्रक्रियेतील आदेशात नमूद असले तरीही कंत्राटदारांमार्फत पोकलॅन व जेसीबीसारख्या यंत्राव्दारे अवैघ उपसा करून वाहतूक केली जात आहे. तीन ब्रासच्या वाहतूक परवान्यावर सात ब्रास रेतीची वाहतूक केली जात असल्याने शासनाचा कोटय़वधींचा महसूल बुडत आहे. गोदावरी व इंद्रावती नदीचा प्रवाह आंध्रप्रदेशाच्या बाजूने असल्याने त्यांना दरवर्षी पुराचा फटका बसतो. मात्र, सिरोंचाच्या बाजूने रेतीचा उपसा अधिक केल्यास भविष्यात नदीचा प्रवाह बदलून सिरोंचा परिसरातील गावांना पुराचा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा प्रकार अनेक दिवसांपासून सुरू आहे.

चंद्रपूर जिल्ह्य़ात ब्रम्हपुरी तालुक्यातील कोलारी (बेलगाव) घाटावर नागपूरच्या काही रेती तस्करांनी मध्यरात्री दरोडा घातला. यात अख्खा रेतीघाट लुटण्यात आला. रेती घाटावरील संपूर्ण रेती तस्कर नेत असल्याचे समोर येताच तहसीलदारांना माहिती देण्यात आली. त्यांनी छापासत्र राबविल्यानंतर २३ लाखांची रेती जप्त करण्यात आली. यात नागपूर भंडारा येथील पाच आरोपींना अटक करण्यात आली. दरम्यान, ही तस्करी कित्येक वर्षांपासून सुरू आहे. या तिन्ही नद्यांच्या घाटावरून रेती ट्रकांमध्ये भरून न्यायची आणि जादा दराने विक्री करायची, असा हा प्रकार आहे.

शासन व प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष – आ. वडेट्टीवार

या प्रकाराकडे शासन व प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष असल्याचा आरोप कॉंग्रेस विधीमंडळ उपनेते विजय वडेट्टीवार यांनी केला होता. त्यानंतरही असले प्रकार सुरूच आहेत. गडचिरोलीचे जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक व महसूल अधिकाऱ्यांच्या आशीर्वादानेच सिरोंचात रेती तस्कर सक्रीय असल्याचा आरोपही वडेट्टीवार यांनी केला होता. त्यानंतर नायक यांनी जिल्ह्य़ातील सर्व रेतीघाटांवर सुर्यास्त ते सुर्योदय या कालावधीत उत्खनन व वाहतुकीस बंदी घालण्याचे आदेश दिले. तसेच रेती वाहतुकीवर सीसीटीव्हीव्दारे येत्या काळात लक्ष्य ठेवण्याचे निर्देश दिले. या प्रकाराकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देऊन रेती उपसा व वाहतूक थांबविण्यात यावी आणि महसुलाच्या स्वरूपात शासनाची झालेली नुकसान भरपाई संबंधितांकडून वसूल करावी, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे. यासंदर्भात महसूल मंत्री व सचिवांकडे तक्रार केली असून हा मुद्दा येत्या हिवाळी अधिवेशनात चांगलाच गाजणार आहे.