केंद्र सरकाच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीत जवळपास दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी, आज(सोमवार) स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात सांगली ते कोल्हापूर अशी ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली. सांगलीमधील विश्रामबाग येथील क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यापासून अभिवादन करून ट्रॅक्टर मोर्चाला सुरूवात करण्यात आली.

सांगली ते कोल्हापूर असा मोर्चाचा मार्ग आहे. या मोर्चासाठी शेतकरी ट्रॅक्टर घेऊन मोठ्या संख्येने हजर झाले होते. तसेच, सहभागी शेतकऱ्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा झेंडा देखील ट्रॅक्टरवर लावलेला होता. केंद्र शासनाने तिन्ही शेतकरी कायदे परत घ्यावेत, अशा जोरदार घोषणा दिल्या जात होत्या.

आणखी वाचा- “ठाकरे सरकार पडलं नाही तरी…,” गिरीश बापट यांचं मोठं विधान

विरोधी पक्षाची म्हणावी तशी साथ मिळत नाही –
“ शेतकरी विरोधी कायद्याविरोधात देशव्यापी शेतकरी आंदोलन सुरू असताना, विरोधी पक्षाची म्हणावी तशी साथ मिळत नाही. बड्या भांडवलदारांच्या भीतीने अंकित झालेले विरोधक या आंदोलनाला साथ देत नाहीत.” अशी खंत राजू शेट्टी यांनी यावेळी बोलून दाखवली.