माजी आमदार राजेंद्र देशमुख भाजपमध्ये जाणार विधानपरिषद निवडणुकीवेळी सुरू झालेली राष्ट्रवादीची पडझड जिल्हा परिषद निवडणुकीवेळीही कायमच राहिली असून माणगंगेच्या काठाला तग धरून असणारी राष्ट्रवादी पुरती नामोहरम करण्यात भाजपाला यश आले आहे. आटपाडीचे माजी आमदार राजेंद्र देशमुख यांच्या भाजपा प्रवेशाने जिल्ह्याचे राजकारण नवीन वळणावर पोहचले असून एकेकाळी आघाडी शासनावर दबाव गट म्हणून राष्ट्रवादीतूनच ताकद देउन उभा केलेला दुष्काळी फोरम आज भाजपाच्या तंबूत डेरेदाखल झाला आहे. आटपाडीच्या देशमुख वाडय़ाचे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे ऋणानुबंध अगदी एस काँग्रेसच्या कालावधीपासून कालपरवा पर्यंत अबाधित राहिले आहेत. याच नातेसंबंधामुळे देशमुख वाडय़ावर भाजपाचे निशाण कधी लागेल असा अंदाज व्यक्त करणार्याला या माणगंगेच्या काठावरील माणदेशी माणूस मुर्खात काढल्याशिवाय राहत नव्हता. देशमुख घराण्याचे आणि अगदी स्व. बाबासाहेब देशमुख यांच्यापासून बारामतीकरांचे घरगुती संबंध असल्याने काही झाले तरी आटपाडी हा बालेकिल्ला राष्ट्रवादीचाच राहणार असा ठाम विश्वास जिल्हा नेत्यांना होता. मात्र गेल्या दोन वर्षांत पुलाखालून बरेच पाणी गेले. काळ बदलला तसे जिल्ह्याच्या राजकारणात गृहित धरण्यामुळे दुखावले गेलेले देशमुख दुरावत गेले. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद अमरसिंह देशमुखांना दिले, ५३ गावच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी मदत राहो मात्र जिल्हा पातळीवर आडकाठी आणण्याचेच प्रयत्न झाल्याची खंत मनात दाटली होती. राज्य स्तरावर वरिष्ठ म्हणजे खुद्द अजित पवारनी हस्तक्षेप करीत या योजनेला निधी उपलब्ध करून दिला. राज्याच्या राजकारणात निधीची पळवापळवी रोखण्यासाठी जतचे विलासराव जगताप, कवठय़ाचे अजितराव घोरपडे, तासगावचे संजयकाका पाटील, कडेगावचे पृथ्वीराज देशमुख यांनी सिंचन योजनेच्या पूर्ततेसाठी दुष्काळी फोरम स्थापन करून अजित पवार यांच्याशी थेट संपर्क साधला. नेमकी हीच बाब आ. जयंत पाटील यांना खटकली असावी. यातूनच या दुष्काळी फोरममध्ये बेबनाव कसा निर्माण होईल यासाठी पेरणी सुरू केली. यामध्ये पडद्याआड काही काँग्रेसची नेते मंडळीही होती. या दुष्काळी फोरममधील संजयकाका पाटील यांनी अगोदर भाजपामध्ये प्रवेश करून खासदारकी पदरात घेतली. विधानसभेवेळी जगताप, देशमुख, घोरपडे यांना भाजपाने उमेदवारी दिली. याचवेळी राजेंद्र देशमुख यांना भाजपामध्ये येण्याचा आग्रह धरला होता. मात्र पवार घराण्याची असलेला घरोबा सोडून येण्यास त्यांनी नकार दिला. मात्र, जिल्ह्याच्या राजकारणात गृहित धरण्याच्या राष्ट्रवादीच्या नेत्यामुळे बेदखल केले जात असल्याची वेदना मात्र कायम होती. यातूनच दुष्काळी फोरमचे साथीदार भाजपात येण्याची वारंवार साद घालत होते. यातच सत्ता भाजपाची असल्याने टेंभूचा लाभ तालुक्याला व्हावा, रखडलेला विकास गतीने व्हावा या तडजोडीबरोबरच दुष्काळी भागात उसाची आवश्यक तेवढी उपलब्धता नसतानाही चालविला जाणार्या माणगंगा सहकारी साखर कारखान्याला मदत व्हावी याची गणिते घालत आणि पुढची आमदारकी डोक्यात घेत देशमुखांच्या गडीवर आता भाजपाचे निशाण लावले गेले.