शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे दिल्लीत बसून शरद पवारांच्या सल्ल्याने शकुनी मामाची भूमिका पार पाडत आहेत, असा गंभीर आरोप भाजपचे मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी केला आहे. ते उस्मानाबाद येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी निलंगेकर-पाटील यांनी संजय राऊत आणि शिवसेनेच्या मंत्र्यांवर जोरदार हल्ला चढवला. मंत्रिमंडळाच्या बैठकीत चांगला निर्णय होत असेल तरीही शिवसेनेचे मंत्री त्यामध्ये अडथळा आणतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कोणत्याही परिस्थितीत शिवसेना आणि भाजप यांची युती हवी होती. मात्र, दिल्लीत काही जण पवारांच्या अवतीभवती बसून राजकारण शिजवतात. व्यक्तीच्या लाभासाठी या लोकांनी युतीमध्ये विष कालवण्याचे काम केले आहे, अशी टीका निलंगेकरांनी केली. काही दिवसांपूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील कार्यक्रमात भाजपशी युती तोडण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शिवसेनेने राज्य सरकारचा पाठिंबा काढल्यास भाजपने आमच्याकडे चर्चेला यावे, असे सूचक विधान केले होते. मात्र, आम्ही न मागताही शरद पवार पाठिंबा देऊन भाजपला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत असल्याचे निलंगेकर-पाटील यांनी सांगितले. दरम्यान, शिवसेनेने युती तोडल्याचे जाहीर केल्यानंतर भाजपच्या पहिल्याच सभेत मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेवर शरसंधान साधले होते. शिवसेनेला कौरवांची उपमा देत आता धर्मयुद्ध होऊनच जाऊ द्या, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी महापालिका प्रचाराचे रणशिंग फुंकले. मुंबईतील गोरेगावच्या विजय संकल्प मेळाव्यात बोलताना महाभारतातील दाखले देत मुख्यमंत्र्यांना शिवसेनेवर जोरदार टीका केली. ‘दुर्योधनाच्या बाजूला अनेक शकुनी मामा आहेत. भाजपची औकात काय, असे ते म्हणतात. २१ फेब्रुवारीला भाजपची काय औकात आहे, ते दाखवून देऊ, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेला प्रतिआव्हान दिले होते.